

पुणे: राज्यातंर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पीक स्पर्धा या रब्बी हंगाम 2025 मध्ये घेण्यात येत आहेत. त्यामध्ये रब्बी हंगामात सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या पाच पिकांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती कृषी आयुक्तालयातून देण्यात आली. पीक स्पर्धा मागील वर्षाप्रमाणे तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर राबवण्यात येत आहेत.
राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोगाद्वारे उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांच्या मनोबलात वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यायावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. त्यामुळे कृषी उत्पादनात भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल, तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण शेतमाल उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेवून राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबवण्यात येत आहे.
पीकस्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत भाग घेता येईल. पीकस्पर्धेत सहभागी लाभार्थ्यांच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान 40 गुंठे क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.
स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी 300 रुपये राहील व आदिवासी गटासाठी 150 रुपये राहील. उपरोक्त नमूद पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ व्हावी यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीकस्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले. शासनाच्या कृषी विभागाचे संकेतस्थळ ला भेट द्यावी. पीकस्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, सातबारा व 8-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (आदिवासी असल्यास), पीकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित सातबारा उताऱ्यावरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा जोडणे आवश्यक आहे. बँक खाते चेक, पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत. ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या पिकांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. तालुका, जिल्हा व राज्य स्तरावरील पीकस्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पीकस्पर्धा विजेते निवडण्यात येतील.