

पुणे: राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तसेच हवामानबदलामुळे निर्माण होणाऱ्या आपत्तींच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मानसिक, सामाजिक व आर्थिक समस्यांवर प्रभावी उपाययोजना राबविण्यासाठी राज्य सरकारने कृषी विभागांतर्गत राज्यस्तरीय टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या टास्क फोर्सवर शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी विकसित केलेल्या ‘पिरॅमिड मॉडेल’चे जनक व कृषी धोरणातील तज्ज्ञ संशोधक डॉ. विनायक हेगाणा यांची विशेष सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.
कृषी आयुक्त सुरज मांढरे यांच्याकडून जारी केलेल्या शासन परिपत्रकानुसार, या टास्क फोर्सचे अध्यक्ष हे कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) रफिक नाईकवाडी हे आहेत. तर, कृषी संचालक (कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणा तथा आत्मा) सुनील बोरकर, उदय देशमुख, गणेश घोरपडे, जीवन बुंदे, नंदकिशोर नाईनवाड, सत्यजित शितोळे, सोनाली शिळकर हे शासकीय सदस्य आहेत. तर सृष्टी डोईजड ह्या अशासकीय सदस्य म्हणून आपले योगदान देणार आहेत.
टास्क फोर्समार्फत शेतकरी आत्महत्यांची आर्थिक, सामाजिक व मानसिक कारणमीमांसा, हवामान बदलांचे परिणाम, अल्पकालीन व दीर्घकालीन धोरणात्मक उपाय तसेच एकात्मिक हस्तक्षेप मॉडेल विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे.
कृषी आयुक्त सुरज मांढरे म्हणाले, शेतकरी आत्महत्या हा केवळ आत्महत्येनंतर नुकसानभरपाई देण्याचा विषय नाही. शेतकऱ्याला कशा पद्धतीने अधिक सक्षम करता येईल, यादृष्टीनेही या विषयाकडे पाहणे गरजेचे आहे. त्यासाठी कृषी विभागातील सर्व योजना, उपक्रम यांचा समन्वय इतर विभागांशी घालून अधिकाधिक प्रभावी पद्धतीने उत्पादनवाढीसोबतच उत्पन्नवाढीसाठीही प्रयत्न करणे शक्य व्हावे म्हणून हा टास्क फोर्स तयार केला आहे.
...असे आहेत टास्क फोर्सचे उद्देश
शेतकऱ्यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरणाऱ्या घटकांचा अभ्यास आणि संशोधन
हवामानबदलामुळे शेतीवर होणाऱ्या परिणामांचा आढावा घेऊन त्यावर उपाययोजना सुचविणे
शेतकरी आत्महत्या प्रतिबंधासाठी धोरणात्मक उपयोजना
शेतीचे तंत्रज्ञान, आर्थिक साहाय्य, सामाजिक आधार आणि मानसिक आरोग्यावर आधारित एकात्मिक पद्धती विकसित करणे
आपत्तीपूर्व तयारी, आपत्तीच्या काळातील तातडीच्या उपाययोजना आणि आपत्तीनंतरच्या पुनर्वसनासाठी विशेष कृती कार्यक्रमाची निर्मिती
विभागीय आणि जिल्हास्तरावरील अंमलबजावणीसाठी कृती आराखडा तयार करणे
विविध शासकीय, निमशासकीय आणि स्वयंसेवी संस्थांशी समन्वय साधणे.
आत्तापर्यंत ‘शिवार संसद’ आणि ‘शिवार हेल्पलाइन’द्वारे अडीच हजार शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त केले. आता या कृतिदलात शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी धोरणात्मक पातळीवर काम करण्याची संधी मिळाली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी शाश्वत, वैज्ञानिक आणि मानवी दृष्टिकोनातून प्रभावी मॉडेल उभे करता येईल. तसेच, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठीच्या उपाययोजनांना गती मिळेल. शासनाने कृषी आयुक्त सुरज मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिलेली ही जबाबदारी शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी धोरणात्मक पातळीवर काम करण्याची मोठी संधी आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी शाश्वत व प्रभावी मॉडेल उभे करता येईल.
डॉ. विनायक हेगाणा, टास्क फोर्सचे सदस्य