Loksabha election 2024 | जनाई-शिरसाईचे पाणी पुन्हा पेटणार..

Loksabha election 2024 | जनाई-शिरसाईचे पाणी पुन्हा पेटणार..
Published on
Updated on

बारामती : पुढारी वृत्तसेवा : ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांनी सोमवारी (दि. 8) रोजी बारामती तालुक्याच्या जिरायती भागाचा दौरा केला. ठिकठिकाणी दुष्काळी स्थितीची पाहणी केली. जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेवर भाष्य केले. राष्ट्रवादीतील फुटीनंतर या दोन योजनांच्या कामावरून बारामतीत दोन्ही पवारांमध्ये श्रेयवादाची लढाई रंगली आहे. त्यात शरद पवार यांनी आता, ज्यांच्यावर ही जबाबदारी दिली होती, त्यांच्याकडून हे काम झाले नाही. आता काम कसे होत नाही ते मी बघतो, असे म्हणत जिरायत भागातील जनतेला साद घातली.

बारामती तालुक्याच्या जिरायत भागाचा प्रश्न पुढे आला की, जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेचा विषय हमखास निघतो. राष्ट्रवादीतील फुटीनंतर हा प्रश्न आता अधिकच ऐरणीवर आला आहे. पाण्याच्या प्रश्नावरून सुप्यात आंदोलन करण्यात आले होते. याचवेळी जिरायत भागातील काही प्रमुखांनी शरद पवार यांची गोविंदबागेत भेट घेतली होती. त्या आंदोलनाला खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही तत्काळ भेट देत समस्या जाणून घेतली होती.

या प्रश्नावर अजित पवार यांनी मंत्रालयात बैठक घेतली होती. त्यामुळे उपोषण मागे घेण्यात आले होते. या बैठकीत अजित पवार यांनी योजनेसंबंधी अनेक निर्णय घेतले होते. न परवडणारे वीजबिल हे या योजनेचे दुखणे आहे. त्यामुळे सौरऊर्जेवर योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय शासनाने घेतला. शिवाय हे काम माझ्याशिवाय कोणताही मायचा लाल करू शकत नसल्याचेही ठासून सांगितले. तत्पूर्वी ही योजना माझ्या सहीने मार्गी लागल्याचे शरद पवार म्हणाले होते. खा. सुळे या उपोषणकत्र्यांना भेटण्यासाठी गेल्यानंतर एका मावशीने त्यांना, आम्हाला पाणी कधी मिळणार, असा खडा सवाल केला होता.

तो व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. सोमवारच्या दौ-यात शरद पवार यांनी उंडवडी, कारखेल, देऊळगाव रसाळ मार्गे सुपे गाठले. ठिकठिकाणी दुष्काळी स्थितीची पाहणी केली. पवारांच्या या दौ-याला जिरायती जनतेने चांगला प्रतिसाद दिला. मी गेली 20 वर्षे स्थानिक प्रश्न बघत नव्हतो. ही जबाबदारी ज्यांच्यावर दिली होती, त्यांच्याकडून काम झाले नाही. आता मी लक्ष घालणार असून काम कसे होत नाही ते बघतो, असे सांगत शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार यांच्यावर टीका केली. जिरायत भागातील जनतेचे जीवनमान कसकसे उंचावत गेले याचा आलेख मांडला. एकूणच जनाई-शिरसाईच्या पाण्याच्या मुद्द्यावरून आता दोन्ही पवारांमध्ये चढाओढ लागली आहे. जिरायती भागातील जनता पाण्याच्या आश्वासनाच्या जोरावर आता कोणाच्या पारड्यात मत टाकते, हे लोकसभा निवडणूक निकालातच दिसून येईल.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news