

पुणे : शिवाजी शिंदे : सरकारी नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली खिसे भरणार्यांची टोळी कामाला लागली आहे. आरोग्य व म्हाडाच्या परीक्षेत या टोळीला यशही आले. मात्र, ते यश 'भूमिअभिलेख'च्या परीक्षेत मिळविण्याचे स्वप्न भंगणार आहे. कारण संबंधित एजन्सीला आधीच 'लॉक' लावण्याचे काम या विभागाने केले आहे. म्हणून या विभागाच्या परीक्षा निर्विघ्न पार पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
परीक्षा घेतलेल्या 'त्या' एजन्सीला ब्लॅकलिस्ट केले असेल, तर आम्हाला तातडीने कळवा म्हणजे आम्ही आमच्या देखरेखीत परीक्षा घेण्यास मोकळे होऊ, अशा आशयाचे पत्र भीमि अभिलेख विभागाने शासनास दिले आहे. कोरोना काळामुळे सरकारी कार्यालयातील भरती प्रक्रिया लांबल्याने उमेदवारांचे भवितव्य अंधारात आले होते. मागील सहा महिन्यांपासून विविध विभागांतील प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र, जशा परीक्षा सुरू झाल्या तशाच 'टोळ्यां'नी आपले रूप दाखविणे सुरू केले. याचाच परिणाम म्हणून आरोग्य व म्हाडा विभागाच्या परीक्षा पेपरफुटीच्या कारणावरून चर्चेत आल्या. या टोळीतील काही सदस्यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यांच्या मुसक्या आवळल्या.
भूमिअभिलेख विभागाच्या परीक्षा होण्याअगोदरच संबंधित विभागाने राज्य शासनास पत्र पाठवून 'त्या' एजन्सीबाबत काय निर्णय घेतला, हे कळविण्याची विनंती केली आहे. तसेच, या परीक्षा विभागीय आयुक्तांबरोबर सायबर गुन्हे पोलिसांच्या टीमच्या देखरेखीखाली पार पाडण्याची तयारी ठेवली आहे. ऑनलाइन फॉर्म भरताना एखाद्या उमेदवाराने वेगवेगळ्या ठिकाणी फॉर्म भरून वेगवेगळे फोटो लावून डमी उमेदवारांच्या मदतीने परीक्षा देण्याचा प्रत्यत्न केल्यास त्यास तातडीने सायबर पोलिस ताब्यात घेतील, अशी व्यवस्था केली आहे.
''आमच्या विभागाकडून होणारी परीक्षा आम्हीच घेण्याची तयारी ठेवली आहे. त्यासाठी राज्य शासनासह विभागीय आयुक्त व सायबर पोलिसांची मदत घेतली जाणार आहे. आमच्या परीक्षेचा पेपर आम्हीच काढणार आहोत.''
– आनंद रायते, अतिरिक्त आयुक्त, भूमिभिलेख
हेही वाचा