जिल्ह्यातील चाकण, रांजणगाव, तळेगाव या औद्योगिक क्षेत्रात जमीन मिळावी यासाठी देशासह परदेशातील उद्योजकांची सर्वाधिक मागणी असते. त्यातही चाकण एमआयडीसीला उद्योजकांची सर्वाधिक पसंती असते. यामुळेच चाकण एमआयडीसीत एक नाही, दोन नाही तर तब्बल पाच टप्प्यात भूसंपादन करण्यात आले आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ चाकण टप्पा क्रमांक पाचसाठी खेड तालुक्यातील आंबेठाण, रोहकल, गोनवडी, बिरदवडी, चाकण आणि वाकी खुर्द या सहा गावांतील 693.94 हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात येणार आहे. शेतक-यांच्या संमतीने आतापर्यंत 296.66 हेक्टर संपादित करण्यात आले आहे. पंरतु आता शिल्लक क्षेत्रासाठी सक्तीने संपादित करण्यात येणार आहे. सक्तीने भूसंपादन करताना शेतकऱ्यांना शेतीसोबतच घरे, गुरांचे गोठे, फळझाडे यासाठी अधिकचे पैसे देण्यात येणार असल्याची माहिती खेडचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी दिली. या सक्तीच्या भूसंपादनामुळे गेले नऊ वर्षांपासून रखडलेले चाकण टप्पा पाचचे भूसंपादन पूर्ण होणार आहे.