

टाकळी हाजी: शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील जगप्रसिद्ध कुंड पर्यटनस्थळी कुकडी नदीवर २०११ साली बांधण्यात आलेला झुलता पूल दुरुस्तीच्या कारणास्तव अखेर बंद करण्यात आला आहे. पूल धोकादायक अवस्थेत असल्याने ग्रामपंचायतीने प्रशासनाकडे मागणी करूनही दुर्लक्ष होत होते.
मात्र, दैनिक पुढारीने १७ जुलै रोजी प्रसिद्ध केलेल्या झुलत्या पुलावर मृत्यूचे सावट या विशेष वृत्तानंतर प्रशासनाने तात्काळ हालचाली सुरू करत शनिवार, दि. १९ जुलै रोजी पूल बंद करण्याची कारवाई केली. या निर्णयामुळे संभाव्य धोका टळला असून, नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे. (Latest Pune News)
दै. पुढारीच्या बातमीनंतर पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिरूरचे गटविकास अधिकारी महेश डोके यांना पूल बंद करण्याचे आदेश दिले. यानुसार जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे शिरूर शाखा अभियंता अनिल गावडे, टाकळी हाजीचे ग्रामविकास अधिकारी राजेंद्र खराडे, माजी उपसरपंच गोविंद गावडे, कर्मचारी सागर घोडे आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत झुलता पूल बंद करण्यात आला.
हा पूल केवळ २० लोकांच्या क्षमतेचा असतानाही पर्यटन हंगामात यावर १०० हून अधिक लोकांची गर्दी होत असे. त्यामुळे पूल डळमळीत होऊन दुर्घटनेचा मोठा धोका निर्माण झाला होता. पूल बंद करण्यात आल्यामुळे अपघाताचे सावट दूर झाले असून, भाविक आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही महत्त्वाची पावले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
सरपंच अरुणा घोडे यांनी सांगितले की, ग्रामसभेत पारित ठरावानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पूल दुरुस्ती व नवीन आरसीसी पूल उभारणीसाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. पूल पूर्णपणे सुरक्षित होईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
कुकडी नदीवर असलेले रांजणखळगे, मळगंगा देवीचे दोन्ही बाजूंनी असलेली मंदिरे आणि इतर पर्यटन स्थळांमुळे पुणे-नगर सीमेवरील हे पर्यटन स्थळ वर्षभर गर्दीने गजबजलेले असते. या पार्श्वभूमीवर सशक्त झुलता किंवा आरसीसी पूल आणि सुरक्षाव्यवस्थेची गरज अधोरेखित होत आहे.
पूल बंद होणे ही एक सकारात्मक कारवाई असली, तरी या पुलाची दुरुस्ती किंवा नवीन पूल लवकरात लवकर उभारण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या अन्य उपाययोजनांसाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी ग्रामस्थ आणि पर्यटकांकडून केली जात आहे.
दै. पुढारीच्या वृत्ताचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. एक वृत्त, एक जागृती आणि एक निर्णायक कृती – या त्रिसूत्रीच्या आधारे पूल बंद करण्यात आला असून, भविष्यातील सुरक्षिततेच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे.