भोर: भोर तालुक्यात धरण परिसरात पडत असलेल्या पावसामुळे भाटघर व नीरा देवघर धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. भाटघर धरणात शनिवारी (दि. 19) सकाळी 85.93 तर नीरा देवघर धरणात 67.91 टक्के पाणीसाठी होता.
जून महिन्यातील दोन तारखेला भाटघर धरणात एकूण मृतसाठा 7.15 तर नीरा देवघर धरणात 9.38 टक्के पाणीसाठा होता. यावर्षी शनिवारी (दि. 19) सकाळपर्यंत भाटघर धरणक्षेत्रात एकूण 482 मिलिमीटर, तर नीरा देवघर धरणक्षेत्रात 1103 मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.(Latest Pune News)
गेल्यावर्षी 19 जुलै रोजी भाटघर 40.56 तर नीरा देवघर धरणात 31.57 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. परंतु यंदा मे महिन्यात झालेला पाऊस व सध्या पडत असलेल्या पावसाने यंदा भाटघर व नीरा देवघर, वीर, गुंजवणी धरणात 39.53 टक्केहून जास्तीची वाढ झालेली दिसून येते. तसेच तालुक्यात सर्व भागात पाऊस पडत असल्यामुळे ओढे- नाले ओसंडून वाहत आहेत. तर भात शेतीत मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.
वीर धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली असून तो यंदा पहिल्यांदाच 81 टक्क्यांवर पोहचला आहे. तसेच तालुक्यात दोन दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे धरणसाठ्यात कमी वाढ झाली आहे. आता वीर धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रातून 1350, तर गुंजवणी धरणातून 250 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.