

राजगुरुनगर: श्रीक्षेत्र भीमाशंकरच्या संदर्भात 'खेड-आंबेगाव'असा उल्लेख करण्याच्या प्रस्तावाला विरोध व्यक्त करत खेड तालुक्याचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांना मंगळवारी (दि १९) निवेदन दिले. शरद बुट्टे पाटील, कैलास सांडभोर, अरुण चांभारे, जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे, समीर सुपे, माजी सभापती सुरेश शिंदे व इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
निवेदनात दिलीप मोहिते पाटील यांनी म्हटले आहे की,श्री क्षेत्र भीमाशंकर हे खेड तालुक्याचे श्रद्धास्थान आणि ओळखीचे प्रतीक आहे. दिवंगत माजी आमदार नारायणराव पवार यांनी यासाठी सातत्याने संघर्ष केला.मी आमदार असताना देखील भीमाशंकर हे खेड तालुक्याचाच अविभाज्य भाग राहावा यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न केला व करत आहे.
नुकतीच सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिखर समितीची बैठक झाली. यावेळी आंबेगावच्या लोकप्रतिनिधींनी 'भीमाशंकर खेड-आंबेगाव' असा उल्लेख करण्याची सूचना केली. खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबाजी काळे यांनीही या सूचनेला मान्यता दिल्याची माहिती समोर आल्याने खेड तालुक्यातील जनतेमध्ये मोठी नाराजी आणि चिंता व्यक्त होत आहे.
मोहिते पाटील यांनी स्पष्ट केले की, शासन स्तरावर अधिकृत कार्यवृत्त तयार होणार असल्याने 'खेड-आंबेगाव' असा उल्लेख झाल्यास भविष्यात खेड तालुक्याच्या अस्मितेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. आज 'खेड-आंबेगाव' तर उद्या 'खेड' हे नाव पूर्णपणे मागे पडण्याची भीती जनमानसात निर्माण झाली आहे.
दिलीप मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना विनंती केली आहे की, या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. स्थानिक जनभावना, इतिहास आणि वास्तव विचारात घेऊन शिखर समितीच्या कार्यवृत्तात 'भीमाशंकर खेड-आंबेगाव' ऐवजी फक्त 'भीमाशंकर खेड' असाच उल्लेख राहावा यासाठी तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश द्यावेत.
श्रीक्षेत्र भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध असून, ते खेड तालुक्यात आहे. तालुक्याच्या सांस्कृतिक आणि धार्मिक ओळखीत भीमाशंकरचे महत्त्व अत्यंत मोठे आहे. त्यामुळे नामकरणाच्या मुद्द्यावरून दोन्ही तालुक्यांमध्ये दीर्घकाळ चर्चा आणि मतभेद सुरू आहेत.या निवेदनाने खेड तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.