

Khadakwasla Dam Water Release
यवत: खडकवासला धरणातून कोणत्याही क्षणी नदीपात्रात पाणी सोडले जाऊ शकते त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी म्हटले आहे की, पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत असून खडकवासला धरण जलाशयात मंगळवारी( दि. ७) सकाळी १०:०० वाजता ७६ टक्के पाणी साठा झाला आहे.
धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण पाहता व धरणात येणारा येवा पाहता येत्या काही तासांत धरण ८० टक्के अथवा त्याहून अधिक क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. पावसाच्या परिस्थितीनुसार कधी ही धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे.
नदी काठावरील नागरिकांना तसेच आम जनतेला आवाहन करण्यात येत आहे की नदीपात्रात उतरू नये. आणि नदीपात्रात काही साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. सखल भागातील नागरीकांना सूचना देण्यात याव्या आणि उचित कार्यवाही करण्यात यावी. सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी व पाटबंधारे विभागास सहकार्य करावे असे आवाहनही कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी केले आहे
आज मंगळवारी (दि. ७) सकाळी १२ वाजता खडकवासला धरणाच्या नवीन मुठा कालव्यातून ५०० क्यूसेसने विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
किरण देशमुख, कार्यकारी अभियंता, खडकवासला जलसंपदा विभाग