

खेड शिवापूर: परिसरातील तीन तालुक्यांना जोडणारा शिवगंगा नदीवरील पूल पाण्याखाली गेला असून भोर, व राजगड तालुक्यातील नागरिकांचा संपर्क तुटला आहे. पाण्याच्या प्रवाहाने रस्ता उखडण्याची शक्यता आहे. तसेच पाण्याचा प्रवाह वाढल्यास पूल कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान तीन दिवस संततधार असणारा पाऊस कमी झाला असून पुलावरील पाणी कमी झाले आहे. मात्र पुणे ग्रँड स्पर्धेसाठी बनवलेला पुलावरील रस्ता उखडला असल्याचे पाहायला मिळाले. पहाटे पाच वाजल्यापासून शिवगंगा नदीवरील पुलावरून पाणी जाण्यास सुरुवात झाली होती. .
त्यामुळे भोर तालुक्यातील कुसगांव, व राजगड तालुक्यातून येणारे दुग्ध व्यावसायिकांना पूल ओलांडता आला नाही. सकाळी साडेदहा नंतर पुलावरील पाणी कमी होऊन वाहतूक सुरळीत झाली. पुलाच्या साधारण शंभर मीटर अंतरावर कोल्हापुरी बंधारा आहे. सदर बंधाऱ्याच्या प्लेटा काढल्या नसल्याने पाणी पुलावरून गेल्याची चर्चा कुसगांव व शिवापूर गावातील नागरिकांची सुरू होती.