

पुणे: शहराला वर्षभरासाठी लागणार्या १८ टीएमसी पाण्याइतके पाणी यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीत सोडण्यात आले आहे. खडकवासला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणसाखळीतील चारही धरणे जवळपास पूर्ण क्षमतेने भरली आहेत. पाण्याची आवक कायम असल्याने विसर्ग सुरूच आहे.
खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांमध्ये मिळून २९.१३ टीएमसी म्हणजे ९९.९४ टक्के पाणीसाठा नोंदवण्यात आला. गेल्या वर्षी याच दिवशी या धरणांमध्ये २८.३९ टीएमसी म्हणजे ९७.४१ टक्के पाणीसाठा होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ०.७४ टीएमसी पाणी अधिक आहे. पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांतून येणार्या पाण्याच्या प्रमाणानुसार धरणातून नदीपात्रात विसर्ग करावा लागत आहे. यामुळे यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत १८.३८ टीएमसी पाणी मुठा नदीत सोडण्यात आले आहे.
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून शनिवारी (दि.२९) ४ हजार २०८ क्युसेकने विसर्ग सुरू होता. याशिवाय नवीन मुठा उजवा कालव्यातून १,०५४ क्युसेक आणि महापालिकेसाठी ६२२ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत ७४६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
पानशेत धरण परिसरात आतापर्यंत २ हजार २६१ मिलीमीटर पाऊस झाला आहे. धरणाच्या सांडव्यावरून ९८० क्युसेक आणि वीजनिर्मितीसाठी ६०० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. वरसगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात हंगामात एकूण २ हजार ११२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. वरसगावच्या सांडव्यावरून १,४८८ क्युसेक, तर वीजनिर्मितीसाठी ६०० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.
टेमघरमध्ये सर्वाधिक पाऊस
खडकवासला प्रकल्पातील टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा सर्वाधिक पाऊस झाला आहे. येथे हंगामात आतापर्यंत ३,११० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत १४ मिमी. पाऊस झाला. टेमघर धरणात ३.६९ टीएमसी म्हणजे ९९.५५ टक्के पाणीसाठा असून, पाणीपातळी ७०६.४० मीटर आहे. धरणातून वीजनिर्मितीसाठी २५० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. शनिवारी सकाळी ६ ते सायंकाळी ५ पर्यंत चारही धरणांमध्ये मिळून २३६ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक नोंदवण्यात आली.