खडकवासला: डोंगरी पट्ट्यातील तुरळक पावसाचा अपवाद वगळता धरणक्षेत्रात पावसाने आता विश्रांती घेतली आहे. त्यामुळे सलग 47 दिवसांनंतर रविवारी (दि. 3) दुपारी दोन वाजता खडकवासला धरणातून मुठा पात्रातील विसर्ग बंद करण्यात आला.
सायंकाळी पाच वाजता धरणसाखळीत 25.76 टीएमसी म्हणजे 88.38 टक्के पाणीसाठा झाला होता. दरम्यान, यंदाच्या पावसाळ्यात खडकवासला धरणातून आतापर्यंत 12.79 टीएमसी इतके जादा पाणी मुठा नदीपात्रात सोडण्यात आले. (Latest Pune News)
धरणक्षेत्रात पावसाने उघडीप दिल्याने खडकवासला धरणाचा विसर्ग 1 हजार 670 क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला होता. मात्र पाण्याची आवक मंदावल्याने रविवारी धरणाचा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. खडकवासला धरण शाखेच्या शाखा अभियंता गिरीजा कल्याणकर -फुटाणे म्हणाल्या की, गेल्या 17 जूनपासून ते 3 ऑगस्टपर्यंत खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी सोडले जात होते.
मात्र आता विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. वरसगाव व टेमघर धरणांतूनही विसर्ग बंद करण्यात आला आहे. तर पानशेतमधून 600 क्युसेक पाणी खडकवासलात सोडले जात आहे. धरणक्षेत्रातील आवक कमी झाली आहे. खडकवासला धरणाची पाणीपातळी 60 टक्क्यांवर आली आहे. त्यामुळे धरणाचे पाच दरवाजे रविवारी बंद करून विसर्ग बंद करण्यात आला आहे.
टेमघर येथे दिवसभरात 1 आणि पानशेत येथे 2 मिलिमीटर पाऊस पडला. वरसगाव आणि खडकवासला येथे पावसाची नोंद झाली नाही. गेल्या वर्षी 3 ऑगस्ट 2024 रोजी धरणसाखळीत 27.16 टीएमसी म्हणजे 93.16 टक्के पाणीसाठा होता.