वडगाव मावळ(पुणे); पुढारी वृत्तसेवा : गेल्या सात-आठ वर्षांपासून प्रलंबित असलेला वडगाव शहरातील केशवनगर रेल्वे भुयारी मार्ग रद्द झाल्याचे खात्रीलायक वृत्त असून, आता भुयारी मार्गऐवजी त्याचठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
वडगाव शहरातील झपाट्याने नागरिकीकरण वाढत असलेला केशवनगर भाग व सांगवी गावाला वडगाव शहराशी जोडणार्या वडगाव-सांगवी रस्त्यावर असलेले रेल्वे गेट बंद करून त्याठिकाणी भुयारी मार्ग करण्यास दहा वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली होती. त्यानंतर प्रत्यक्ष सर्व्हेक्षण होऊन कामाला सुरुवातही झाली. भुयारी मार्गासाठी आवश्यक असणारे ब्लॉक बनविण्याचे काम दोन-तीन वर्षे सुरू होते व ते
पूर्णही झाले.
त्यानंतर अंतिम टप्प्यातील काम करण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रसामग्री ही आणण्यात आली. त्यामुळे लवकरच भुयारी मार्गाचे काम पूर्ण होईल, अशी आशा नागरिकांना होती. परंतु, काही महिन्यांपूर्वी याठिकाणी आणण्यात आलेली यंत्रसामग्री पुन्हा नेण्यात आली असून ब्लॉक मात्र त्याचठिकाणी पडून आहेत. त्यामुळे भुयारी मार्गाचे काम कधी होणार की होणारच नाही, आता संभ्रम नागरिकांमध्ये निर्माण झाला होता.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी रेल्वेच्या अधिकार्यांनी याठिकाणी येऊन पुन्हा सर्व्हेक्षण केले असून नियोजित रेल्वे भुयारी मार्ग रद्द करण्यात आला आहे व त्याऐवजी उड्डाणपूल उभारण्याच्या दृष्टीने सर्व्हेक्षण करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे आता केशवनगर व सांगवी ग्रामस्थांना पुन्हा काही वर्षे प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
यासंदर्भात खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी भुयारी मार्ग करण्यात तांत्रिक अडचणी असल्याने तो होणे अशक्य असून रेल्वे अधिकार्यांनी पाहणी करून भुयारी मार्गऐवजी उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव दिला असल्याचे सांगून या वृत्ताला दुजोरा दिला.
हेही वाचा