कामशेत(पुणे); पुढारी वृत्तसेवा : गेल्या दोन-तीन दिवसांपासून सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कामशेत परिरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच, पावसामुळे शेतीचे कामेही खोळंबली आहेत.
नाणे व कामशेत परिसर हा पावसाचे आगार मानला जातो. गेली दोन ते तीन दिवस दिवस-रात्र पडणार्या मुसळधार पावसामुळे संततधार पाऊस यामुळे सामान्य माणसाचे जीवन विस्कळीत झाले आहे. नदी, नाले भरून वाहू लागले आहेत. शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे शेतकर्यांना भर पावसात शेताचे काम करावे लागत आहे. तर, काही ठिकाणी शेतीची कामे थांबली आहेत.
नोकरदार वर्गाला भर पावसात कामावर जावे लागत आहे. पावसामुळे वडिवळे बंद असल्यामुळे पंधरा किलोमीटरचा वळसा घालून नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. सतत पाउस पडत असल्यामुळे शाळा-कॉलेजमधील विद्यार्थी घरीच बसून आहेत. सांगिसे, बुधवडी वळख, वडविळे, नेसावे, खांडशी या भागातील विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजमध्ये येणे अतिशय अवघड झाले आहे.
पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे तेही विद्यार्थी शाळेत येत नाही किंवा एवढ्या पावसात पालक आपल्या विद्यार्थ्यांना शाळा पाठविण्याची जोखीम घेत नाहीत. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या रोडावली आहे. नेहमी गजबलेली कामशेतची बाजारपेठही पावसामुळे शांत दिसत आहे. बाजारपेठेत ग्राहकांची तुरळक गर्दी दिसत आहे. वातावरणात गारठा असल्याने आजाराचेही प्रमाण वाढले आहे.
कामशेत शहर परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर जागोजागी पाणी साचले आहे. तसेच, खड्डे पडल्यामुळे चालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकर रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा