पुणे : पुढारी वृत्तसेवा : रक्ताचा अपव्यय टाळण्याच्या दृष्टीने रक्त पिशव्यांसाठी निर्जंतुकीकरण यंत्रे बसवण्याचे आदेश खासगी आणि सरकारी रक्तपेढ्यांना देण्यात आले आहेत. ज्या सरकारी रक्तपेढ्यांकडे सध्या साधने नाहीत, तेथे उपकरणे उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनातर्फे घेतला आहे. बरेचदा लहान मुलांना एखाद्या आजारामध्ये रक्ताची आवश्यकता असते. मात्र, रक्त कमी प्रमाणात लागत असल्याने रक्त पिशवीतील इतर रक्त वाया जाते. रक्त पिशव्यांसाठी निर्जंतुकीकरण यंत्रे बसवल्यामुळे रक्त वाया जाणे आणि एक पिशवी एकापेक्षा अधिक दात्यांसाठी वापरण्याचे प्रमाण कमी होईल. तसेच, रक्त संक्रमणादरम्यान एकाधिक दात्याच्या संपर्कात येणे टाळता येऊ शकेल. रक्ताचा अपव्यय टाळण्यासाठी आणि रक्त संक्रमणादरम्यान अनेक दात्यांच्या संपर्कात येऊ नये, यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने हा निर्णय घेतला आहे.