

आशिष देशमुख
पुणे: भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार १ जून ते २८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत देशभरात सरासरीच्या तुलनेत १३ टक्के कमी पाऊस झाला आहे. देशाची सरासरी ६६४.७ मि.मी. आहे, मात्र या कालावधीत केवळ ५७७.८ मि.मी. पाऊस नोंदवला गेला. एकूण ३६ हवामान उपविभागांपैकी बहुतांश भागात पावसाने ओढ दिली असून, देशातील ३४८ जिल्हे पाणीटंचाईचा सामना करत आहेत. मेघालयमध्ये सर्वाधिक ५८ टक्के तूट आहे.
यंदा अल निनोचा फटका देशातील सर्वंच राज्यांना बसला आहे. देशातील तब्बल १४ राज्य ‘रेडझोन’ (अतितुटीची) आहेत. यामध्ये पूर्वेकडील, ईशान्येकडील आणि दक्षिण भारतातील राज्यांचा सर्वाधिक समावेश आहे. याशिवाय कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झाल्याने या भागांत अवर्षणाची स्थिती गंभीर बनली आहे.
यंदाच्या मान्सून हंगामातील महत्त्वाचे मुद्दे
देशभरातील ३८ जिल्हे ‘मोठ्या तुटीचे’ तर ३१० जिल्हे ‘मध्यम तुटीचे’ म्हणून नोंदले गेले.
२२ राज्ये आणि काही केंद्रशासित प्रदेश सामान्य पाऊस तर बोटावर मोजण्या इतकी राज्ये ‘ब्लू झोन’ (अतिवृष्टी) मध्ये आहेत.
ओडिशामध्ये सरासरीपेक्षा २८ टक्के अधिक पाऊस झाला असून, दिल्लीतही २० टक्के जास्त पाऊस नोंदला गेला आहे.
हवामान शास्त्रज्ञांच्या मते, प्रशांत महासागरात सक्रिय असलेल्या ‘अल निनो’ प्रक्रियेमुळे ऑगस्ट महिन्यातील मान्सून कमजोर राहिला आहे.
दुष्काळी स्थिती नेमकी कुठे किती?
देशातील एकूण भू-भागापैकी सुमारे ३८.९% भाग सध्या दुष्काळ किंवा तीव्र कोरड्या स्थितीचा सामना करत आहे.
देशातील एकूण ७४१ जिल्ह्यांपैकी सुमारे ३९७ जिल्ह्यात कमी पाऊस (४७% ते ५३%)
अतितीव्र दुष्काळी राज्ये
गोवा: ९१.१% क्षेत्र प्रभावित, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश: अनुक्रमे ८६.९% आणि ८६.५% क्षेत्र प्रभावित.
बिहार: सुमारे ८५.६% क्षेत्र, आंध्र प्रदेश: ७५.८% क्षेत्र,. झारखंड,आसाम : ६०%
विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांसह मध्य भारतात ५३% क्षेत्र कोरडे.