

इंदापूर: राज्याच्या अर्थसंकल्पात इंदापूर तालुक्यातील चांडगाव (जि. पुणे) आणि करमाळा तालुक्यातील पोमलवाडी (जि. सोलापूर) तालुक्यांना थेट जोडणाऱ्या उजनी जलाशयावरील पुलासाठी 340 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अतिशय महत्त्वाचा हा पूल पूर्ण करण्याचे आश्वासन दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी इंदापूरकरांना भर सभेत दिले होते, कृषिमंत्री, इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नामुळे आज ते प्रत्यक्षात साकार होत आहे. या पुलासाठी निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सर्व इंदापूरकरांच्या वतीने दत्तात्रय भरणे यांनी आभार मानले आहेत.
या पुलामुळे दोन्ही तालुक्यांमधील दळणवळण सुलभ होणार असून, सुमारे 40 कि.मी. अंतर कमी होणार आहे. इंधनाची बचत होणार आहे. तसेच व्यापार, शिक्षण, आरोग्यसेवा आणि पर्यटनाला चालना मिळून परिसराच्या विकासाला नवे बळ मिळेल, अशी माहिती कृषिमंत्री तथा इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.
या बाबत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, बारामती-लाकडी, कळस-लोणी देवकर-चांडगाव रस्ता (प्रजिमा-65) ते कोर्टी-दिवेगव्हाण-पारेवाडी रेल्वे स्टेशन-केतुर नं.2-पोमलवाडी रस्ता (प्रजिमा-124) यांना जोडणाऱ्या या पुलाची प्रस्तावित लांबी सुमारे 850 मीटर आहे. या महत्त्वाच्या पायाभूत सुविधेसाठी अंदाजे 340 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
इंदापूर तालुका भौगोलिकदृष्ट्या दक्षिण-उत्तर दिशेने सुमारे 46 किमी लांबीचा असून, तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागात उजनी धरणाचा विस्तीर्ण जलाशय आहे. त्यामुळे सध्या इंदापूर आणि करमाळा तालुक्यातील दळणवळण हे उजनी धरणास वळसा घालून भिगवण (ता. इंदापूर) किंवा टेंभुर्णी (ता. माढा) मार्गे करावे लागते. परिणामी सुमारे 70 कि.मी.चे अंतर, अधिक वेळ आणि इंधन खर्च वाढतो. मात्र, इंदापूर तालुक्यातील चांडगाव येथून उजनी पाणलोट क्षेत्र ओलांडत पोमलवाडी (ता. करमाळा) येथे पूल उभारल्यास दोन्ही तालुक्यांमधील अंतर सुमारे 40 कि.मी.ने कमी होणार आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधन खर्चात मोठी बचत होईल. लोणी देवकर (पुणे-सोलापूर महामार्ग) ते चांडगाव हे अंतर अवघे 7 कि.मी. असल्याने या पुलामुळे दोन्ही जिल्ह्यांतील संपर्क अधिक सुलभ होणार आहे.
या पुलामुळे पोमलवाडी तसेच उजनी धरणकाठच्या गावांतील नागरिकांना व्यापार, शिक्षण व वैद्यकीय सेवांसाठी इंदापूर, बारामती तसेच पुणे येथे येणे अधिक सोयीचे होणार आहे. तसेच इंदापूर, बारामती, दौंड आणि कर्जत तालुक्यातील साखर कारखान्यांनाही या मार्गाचा मोठा फायदा होणार आहे. याशिवाय उजनी धरण परिसरातील फ्लेमिंगो आणि इतर स्थलांतरित पक्षी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढणार असल्याने पर्यटन आणि पूरक व्यवसायालाही चालना मिळणार आहे.