पुणे : पुढारी वृत्तसेवा : आपल्या महामानवांची उघड उघड बदनामी होते, ती आपणास खुपत कशी नाही? मान खाली घालून वर्चस्ववाद्यांच्या वळचणीला जाताना लाज कशी वाटत नाही ? असा सवाल अभिनेते किरण माने यांनी उपस्थित केला. जगदीशब्द फाउंडेशन व परिवर्तन संस्थेच्या वतीने दिल्या जाणार्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात किरण माने बोलत होते. गंज पेठेतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात झालेल्या या सोहळ्यास माने यांच्यासह समाज कल्याण सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे, इतिहास अभ्यासक डॉ. श्रीमंत कोकाटे, ज्येष्ठ पत्रकार अभिजित कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच किरण माने यांना शब्दयोद्धा तर महानंदा बडेकर, सुनिता कांबळे यांना सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. किरण माने म्हणाले, दहशतीच्या काळात मानवतेचा, समतेचा झेंडा हाती घेतल्याने मला लक्ष्य केले. पहिल्यांदा माझ्या पोटावर लाथ मारली, माझे काम काढून घेतले. त्यानंतर माझ्याभोवती बदनामीचा सापळा रचला. धमकीचे फोन येत होते. मात्र, कोणत्याही परिस्थितीमध्ये मानवतेचा दिवा विझू न देता लढण्याचे ठरवले होते. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचे खरे विचार अभ्यासल्याने कितीही संकटे आली तरी लढण्याची व जगण्याची रग कमी होत नाही, असेही ते म्हणाले.