

निमोणे: जिल्हा परिषद, पंचायत समित्या एकदाच्या पार पडल्यानंतर आता स्वतःच्या गावात, स्वतःच्या वॉर्डात आपले नशीब आजमावण्यासाठी वॉर्ड रचना कशी होते, आरक्षण कोणते पडते, याचा वेध गावोगावच्या गाव कारभाऱ्यांना लागला आहे.
सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर ‘कही खुशी कही गम’ अशी परिस्थिती बहुसंख्य ठिकाणी निर्माण झाली आहे, थेट जनतेतून सरपंच असल्याने निवडणुका आता सोप्या राहिल्या नाहीत, याची सगळ्यांना जाणीव झाली आहे, भावकी-सगेसोयरे एकत्र करून आपल्या स्वतःच्या वॉर्डात राजकीय मांड ठोकणे, हे आजपर्यंत चालत आले होते; मात्र आता थेट जनतेतून निवडणुकीला सामोरे जायचे असल्याने फक्त आपली भावकी हे पाहून गावगाड्यावर मांड ठोकणे वाटतं तेवढं सोप्पं राहिले नाही.
त्यातच गाव-गाड्यातील वॉर्ड रचना, आरक्षण आणि चक्रीकार पद्धतीने वॉर्डांमध्ये आरक्षण फिरत असल्याने आपल्या वॉर्डात कोणती जागा येते, याची लागलेली धास्ती हे सारं सध्या गावगाडा अनुभवतोय. गाव-गाड्यातील प्रत्येक वॉर्डात अल्पसंख्याक असला, तरीही मूळ ओबीसी मतदार हा निकालावर प्रभावी प्रभाव टाकू शकतो.
त्यामुळे त्याला गोंजारत असताना उद्याच्या काळात कुणबी दाखल्यावर अनेक जण ग््राामपंचायत सदस्यपदासाठी देखील दावेदारी करू शकतात आणि असा काही वाद निर्माण झाला, तर त्याचे थेट परिणाम सरपंचाच्या निवडीवर होऊ शकतात. त्यामुळे कोणाला शब्द द्यायचा, कोणाला तयारीला लाग म्हणायचे, हे देखील गावगाड्यातील धुरंधरांना पहिल्या चरणात तरी बोलता येत नसल्याचे वास्तव आहे.
पॅनेलमध्ये कार्यकर्ता की सोयरा? हा मोठा प्रश्न
ग््राामपंचायत निवडणुकांमध्ये अनेकांना भाग घेण्याची मनीषा असल्याने व बहुतांशी एक-दुसऱ्याचे सगे -सोयरे असल्याने कुणी थांबायचं आणि कुणी लढायचं, हा देखील प्रश्न निर्माण होणार आहे. आपल्याला अपेक्षित असणारी वॉर्ड रचना व आरक्षण वॉर्डात निघाले तरीही आपल्या पॅनेलमध्ये कार्यकर्त्याला घ्यायचं की सोयरा जवळ करायचा हा देखील मोठा प्रश्न या निवडणुकीत निर्माण होणार आहे. थेट जनतेतून सरपंचपदाची निवडणूक असल्याने वॉर्डात गडबड झाली तर सगळंच गणित बिघडणार असल्याने जी काही वॉर्ड रचना होईल, त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.