

पुणे : राज्यातील यंदाच्या 2025-26 च्या हंगामामध्ये आत्तापर्यंत 446 लाख मे. टनाइतके ऊस गाळप पूर्ण झालेले आहे. तर 8.52 टक्क्यांइतक्या निव्वळ उताऱ्यानुसार साखरेचे 38 लाख मेट्रिक टनाइतके साखर उत्पादन हाती आलेले असून तशी माहिती साखर आयुक्तालयाच्या ताज्या अहवालातून मिळाली.
साखर आयुक्तालयाने यंदाच्या हंगामात 102 सहकारी व 105 खासगी मिळून 207 साखर कारखान्यांना ऊस गाळप परवाने दिले आहेत. त्यापैकी प्रत्यक्षात 191 कारखान्यांकडून ऊस गाळप सुरू आहे. त्यामध्ये 95 सहकारी आणि 96 खासगी कारखान्यांचा समावेश आहे.
कोल्हापूर विभागात 37 कारखान्यांकडून 98.79 लाख मे.टन ऊस गाळप पूर्ण केले आहे. तर सर्वाधिक 10 टक्के उताऱ्यानुसार 98.77 लाख क्विंटलइतके साखर उत्पादन तयार केले आहे. साखर उत्पादन आणि उताऱ्यात कोल्हापूर विभाग आघाडीवर आहे. तर सर्वाधिक ऊस गाळपातील पुणे विभागाची आघाडी तूर्त कायम आहे. या विभागातील 30 कारखान्यांकडून 109.34 लाख मे. टन ऊस गाळप पूर्ण झाले आहे. तर 8.78 टक्के 96 लाख क्विंटलइतके साखर उत्पादन तयार केलेले आहे.
सोलापूर विभागात सर्वाधिक 43 साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम सुरू आहे. या कारखान्यांनी आत्तापर्यंत 94.63 लाख मे.टन ऊस गाळप पूर्ण केले आहे. तर 7.67 टक्के उताऱ्यानुसार 72.6 लाख क्विंटलइतके साखर उत्पादन तयार केले आहे. अहिल्यानगर विभागातील 26 कारखान्यांनी 53.23 लाख मे.टन ऊस गाळप पूर्णकेले आहे.
तर 7.96 टक्के उताऱ्यानुसार 42.38 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन तयार केलेले आहे. राज्यातील अन्य विभागातील ऊस गाळप तुलनेने कमी आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये 41.44 लाख मे.टन, नांदेड 43.89 लाख मे.टन, अमरावती 4.69 लाख मे.टन तर नागपूर विभागात जेमतेम तीन हजार मे.टनाइतके ऊस गाळप झाले आहे.