बेल्हे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेळीचा मृत्यू झाला. राजुरी (ता. जुन्नर) येथील पिंगळेमळ्यात सोमवारी (दि. 26) सकाळी ही घटना घडली. राजुरी येथील पिंगळेमळ्यात अनिल ज्ञानदेव पिंगळे यांचा शेळीपालनाचा व्यवसाय आहे. पिंगळे यांनी त्यांच्या शेळ्या नेहमीप्रमाणे घरालगत असलेल्या गोठ्यात बांधल्या होत्या. सोमवारी पहाटेच्या सुमारास दबा धरलेल्या बिबट्याने गोठ्यात प्रवेश करून शेळीवर हल्ला केला. त्यानंतर तिला जबड्यात पकडून जवळच असलेल्या ऊसशेतात नेत तिचा फडशा पाडला.
पिंगळे हे सकाळी गोठ्याजवळ गेले असता त्यांना त्या ठिकाणी रक्त दिसले तसेच गोठ्यातील एक शेळी गायब असल्याचे लक्षात आले. बिबट्याने शेळीला ओढत नेल्याच्या जमिनीवरील खुणाही त्यांना दिसून आल्या. त्या दिशेने गेल्यावर त्यांना ऊसशेतात अर्धवट खाल्लेले शेळीचे धड दिसले. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे वन कर्मचारी त्रिंबक जगताप, स्वप्निल हाडवळे यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.
रविवारी (दि. 25) गावात एका मेंढपाळाचा कुत्रा बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाला. त्यामुळे नागरिकांमध्ये कमालीची दहशत निर्माण झाली आहे. बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वन विभागाने परिसरात पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
हेही वाचा