खडकवासला : धरणक्षेत्रातील कडकडीत उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे. शेतीसह पिण्यासाठी पाणी सोडले जात असल्याने पानशेत व वरसगाव धरणाच्या पाणीपातळीत वेगाने घट सुरू आहे. यामुळे खडकवासला धरणसाखळीत सोमवारी दिवसअखेर 8.31 टीएमसी (28.52 टक्के) इतका पाणीसाठा शिल्लक होता.
पानशेत धरणाची पाण्याची पातळी 26 टक्क्यांवर गेल्याने धरणाचे बहुतांश पाणलोट क्षेत्र उघडे पडले आहे. 12 जुलै 1961 मध्ये फुटलेल्या जुन्या पानशेत धरणाचे खांबही उघडे पडले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत धरणसाखळीत केवळ दीड टक्का पाणी जादा असले, तरी तीव्र उन्हामुळे आगामी काळात पुणेकरांसह परिसरातील एक कोटी नागरिकांवर पाणीकपातीचे संकट उभे आहे. चार धरणांच्या खडकवासला धरणसाखळीतील टेमघर धरण जवळपास कोरडे ठणठणीत पडले आहे. (latest pune news)
पानशेतमध्ये 2.78 टीएमसी म्हणजे 26.09 टक्के, तर वरसगावमध्ये 4.34 टीएमसी म्हणजे 33.88 टक्के पाणी आहे. खडकवासलातून सध्या दौंड, हवेली, इंदापूरसह जिल्ह्यातील 66 हजार हेक्टर शेतीला उन्हाळी आवर्तनाचे दुसरे पाणी सोडले जात आहे.
पुणे शहर व परिसराला मागणीप्रमाणे पिण्यासाठी पाणी सोडले जात आहे. धरणसाखळीची एकूण पाणी साठवणक्षमता 29.15 टीएमसी आहे. शेती व पिण्यासाठी पाणी सोडले जात असल्याने तसेच कडकडीत उन्हामुळे धरणांतील पाण्याचे बाष्पीभवन वाढले आहे. दर तासागणिक धरणसाठ्यात घट सुरू आहे.
गतवर्षीच्या तुलनेत धरणसाखळीत जेमतेम दीड टक्कापेक्षा अधिक पाणी आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी 5 मे 2024 रोजी धरणसाखळीत 7.60 टीएमसी (26.8 टक्के) इतका पाणीसाठा होता.
नियोजनाप्रमाणे दौंड-हवेली-इंदापूरसह जिल्ह्यातील शेतीला दुसरे उन्हाळी आवर्तन तसेच पिण्यासाठी मागणीप्रमाणबपाणी सोडले जात असल्याने पानशेत व वरसगाव धरणातून प्रत्येकी 600 क्सुसेक पाणी खडकवासला धरणात सोडले जात आहे. दुसर्या आवर्तनात तीन टीएमसी पाणी दिले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पिकांना तसेच तेथील रहिवाशांना लाभ मिळणार आहे.
- अनुराग मारके, शाखा अभियंता, पानशेत जलसंपदा विभाग