वाल्हे: आषाढी वारीसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आळंदीहून पंढरपूरकडे 19 जूनला प्रस्थान होत आहे. दिवे घाट ते निरा या 50 किलोमीटर पालखी मार्गावरील चौपदरीकरणाचे काम अद्यापही सुरू असून, झाडांची कत्तल झाल्यामुळे यंदाही वारकर्यांना रखरखत्या उन्हातून पायी वारी करावी लागणार आहे.
श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पायी पालखी सोहळा पुरंदर तालुक्यातून दि.22 ते 26 जून या कालावधीत मार्गस्थ होणार आहे. तालुक्यातील पालखी मार्गावर पूर्वी जुनी व मोठी सावलीची झाडे होती. या झाडांच्या सावलीत वारकरी विसावा घेत होते. (Latest Pune News)
मात्र, मागील दोन-तीन वर्षांपासून पालखी मार्गाचे रुंदीकरण सुरू झाल्याने मार्गावरील हजारो झाडांची कत्तल करण्यात आली. त्यामुळे पालखी मार्गावर सध्या थोडा वेळ उसंत घ्यायची असल्यास सावली शोधून सापडणार नाही. वारकर्यांना उन्हात तापलेल्या मार्गावर पायी चालावे लागणार आहे.
जेजुरी औद्योगिक वसाहत ते निरा यादरम्यान श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे. या मार्गावर 100 वर्षांपूर्वीची जुनी झाडे होती. दौंडज खिंड ते पिसुर्टी कमानीपर्यंत मार्गाचे रुंदीकरण करताना जुन्या रस्त्याच्या कडेची सर्वच्या सर्व झाडे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. त्यामुळे भविष्यात पालखी मार्ग रुंद होईल पण किमान दहा वर्षे तरी या पालखी मार्गावर सावलीची झाडे येणे अशक्य असल्याचे वृक्षप्रेमी बोलत आहेत.
पालखी मार्गाचे अर्धवट काम
सासवड ते जेजुरी या मार्गाचे चौपदरीकरण 17 वर्षांपूर्वी सुरू झाले. आजही काही ठिकाणी अर्धवट पद्धतीने काम झाले आहे, तर अनेक ठिकाणी पुलांची कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. अशा ठिकाणी सुरक्षेच्या कोणत्याच उपाययोजना केलेल्या दिसून येत नाहीत. पालखी सोहळ्याच्या एक-दोन दिवस आधी सुरक्षेची तकलादू साधने लावली जातात. मात्र, पालखी परतीच्या प्रवासाआधीच ती नाहीशी झालेली असतात. पुन्हा बारा महिने या मार्गावरून जाणार्या प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.
दौंडज खिंडीतील विसावास्थळ भकास
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पायी पालखी सोहळा वाल्हेकडे मार्गस्थ होताना दौंडज खिंडीत सकाळच्या न्याहारीसाठी विसावतो. या परिसरातील जुने वटवृक्ष, पिंपळसह छोटी बोराची झाडे काढल्याने विसावास्थळ भकास झाले आहे.
शिवाय या ठिकाणी नुकतेच झालेले रेल्वेचे लोहमार्गावर विस्तारीकरण व पालखी महामार्ग रुंदीकरण, यामुळे मातीचे भराव टाकल्याने सोहळ्याच्या न्याहारीसाठी मोठे अडथळे निर्माण होणार आहेत. पालखी सोहळा पुरंदर तालुक्यात दाखल होण्यास 50 दिवस बाकी आहेत. मात्र, यादरम्यान पालखी मार्गाचे काम पूर्ण होणे अशक्य आहे. या वर्षीही तालुक्यातून पालखी सोहळा अडखळतच जाईल, अशी चर्चा होत आहे.