![पुणे : बदली झाली तरी सोडवेना खुर्ची! सीईओंचे विभागप्रमुखावर कारवाईचे आदेश](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F02%2FZP-Pune.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुणे; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेतील कर्मचार्यांच्या अंतर्गत बदल्या होऊनदेखील अनेकजण त्याच खुर्चीला चिकटून बसले आहेत. वेळोवेळी सांगूनदेखील कर्मचारी त्यांच्या पहिल्या जागेवरच काम करत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे कर्मचार्यांना तत्काळ कार्यमुक्त न केल्यास थेट विभाग प्रमुखांवरच कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी दिला आहे. यावर्षीच्या अंतर्गत बदल्या पार पडल्या. मात्र, या बदल्या होऊनदेखील अनेक जणांना कार्यमुक्त करण्यात आलेले नाही.
याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत नाराजी व्यक्त केली आहे. पाच वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच विभागात काम करणार्या कर्मचार्यांची इतर विभागांचा अनुभव मिळण्यासाठी आणि कामाची संधी मिळण्यासाठी अंतर्गत बदली करण्यात येते. तर एकाच टेबलवर जास्त दिवस काम केलेल्या कर्मचार्यांचा टेबल तीन वर्षांनी बदलला जातो.
तर दहा वर्षांनी कर्मचार्यांची प्रशासकीय बदली होते, त्यांची जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातून इतर ठिकाणी बदली करण्यात येते. ज्या कर्मचार्यांच्या बदल्या झाल्या, अशा कर्मचार्यांच्या बदलीचे आदेश देण्यात आले होते. मात्र, तरीदेखील अनेक कर्मचारी त्यांच्या पहिल्याच ठिकाणी कामे करताना दिसून येत आहेत.
हेही वाचा