

जेजुरी: श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ८ जुलै रोजी श्रीक्षेत्र आळंदी येथून प्रस्थान होणार आहे. यादृष्टीने ग्रामीण हद्दीत पालखी प्रस्थान सोहळा बंदोबस्त ११ ते १५ जुलै या कालावधीत राहणार आहे. पालखी मार्गावरील वाहतुकीमध्ये बदल करून ती पर्यायी मार्गाने वळविण्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला आहे.
पुणे ते सासवड (सासवड मुक्काम) : ११ जुलै रोजी पहाटे २ वाजल्यापासून ते १३ जुलै रोजी रात्री १२ वाजेपर्यंत पुणेकडून सासवडकडे दिवेघाट व बोपदेव घाटमार्गे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. या मार्गावरील वाहने खडीमशिन चौक-कात्रज-कापूरहोळमार्गे जातील. सासवडकडून पुणे बाजुकडे येणारी वाहतूक गराडे-खेड-शिवापूरमार्गे वळविण्यात येणार आहे.
सासवड ते जेजुरी (जेजुरी मुक्काम) आणि जेजुरी ते वाल्हे (वाल्हे मुक्काम) : १३ जुलै रोजी पहाटे २ वा. पासून ते १४ जुलै राजी १२ वा. पुणे येथून सासवड-जेजूरी-वाल्हे-निराकडे तसेच निरा येथून पुणेकडे जाणाऱ्या वाहनांनी झेंडेवाडी-पारगाव मेमाणे-सुपे-मोरगाव-निरा या मार्गाचा वापर करावा.
वाल्हे ते लोणंद (लोणंद मुक्काम) : १५ रोजी पहाटे २ वा पासून ते १५ रोजीचे सायं ५ वा. पर्यंत पुणे येथून सासवड-जेजुरी-वाल्हे-निराकडे तसेच निरा येथून पुणेकडे जाणाऱ्या वाहनांनी सासवड-जेजुरी-मोरगाव या पर्यायी मार्गाचा वापर वापर करावा.
लोणंद येथून पुढे फलटणमार्गे : १५ ते १८ जुलै या कालावधीत फलटण-लोणंद येथून पुणे येथे येणारी वाहने शिरवळमार्गे पुणेकडे येतील. तसेच, पुणे येथून फलटण व लोणंदकडेजाणारी वाहने शिरवळमार्गे जातील. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन डुडी यांनी केले.