

खोर : जिल्हा परिषद निवडणुकीत दौंड तालुक्यातील चार आमदार घराण्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ही निवडणूक स्थानिक राजकारणापुरती मर्यादित न राहता भविष्यातील राजकारणाची नांदी ठरण्याची शक्यता आहे. सोमवारी (दि. 9) जाहीर होणाऱ्या निकालातून कोणाचा राजकीय वारसा पुढे जाणार याचा फैसला होणार आहे. त्यामुळे संपूर्ण दौंड तालुक्याचे लक्ष आजच्या निकालाकडे लागले आहे.
पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक अटीतटीने पार पडली. दौंड तालुक्यातील चार माजी आमदार घराण्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. ही निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेपुरती मर्यादित न राहता, कोणाचा राजकीय वारसा पुढे जाणार, याचा निर्णय करणारी ठरणार आहे. या निकालातून दौंडच्या राजकारणाची पुढील दिशा स्पष्ट होणार आहे. दौंड तालुक्यातील विविध जिल्हा परिषद गटांमध्ये माजी आमदारांचे पुत्र, नातवंडे आणि घराण्यांचे वारस थेट रिंगणात उतरल्याने या निवडणुकीला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे.
सत्ता, वर्चस्व आणि वारसा, या तिन्ही मुद्द्यांभोवती फिरणारी ही लढत शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार झाली होती खडकी-देऊळगावराजे जिल्हा परिषद गटात माजी आमदार उषादेवी जगदाळे यांचे पुत्र वीरधवल बाळासाहेब जगदाळे हे राष्ट्रवादी काँग््रेास पक्षाकडून रिंगणात होते. त्यांच्याविरोधात नुकताच भाजपमध्ये प्रवेश करून ऐनवेळी उमेदवारी मिळविलेले आप्पासाहेब पवार मैदानात उतरले. त्यामुळे या गटात चुरशीची लढत पाहायला मिळाली. वरवंड-पारगाव गटात माजी आमदार दिवंगत राजाराम ताकवणे यांच्या नात मानसी नामदेव ताकवणे यांनी शिवसेना (शिंदे गट) कडून उमेदवारी घेत निवडणूक लढवली.
त्यांच्याविरोधात भाजपकडून सारिका संजय दिवेकर, तर राष्ट्रवादी काँग््रेासकडून गायत्री विशाल खळदकर यांनी जोरदार आव्हान उभे केले आहे. ताकवणे घराण्याचा राजकीय वारसा पुढे चालू राहणार का? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. केडगाव:बोरीपार्धी गटात दोन मातब्बर आमदार घराण्यांमध्ये थेट संघर्ष पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग््रेासकडून माजी आमदार रमेश थोरात यांचे पुत्र तुषार रमेश थोरात, तर भाजपकडून माजी आमदार दिवंगत काकासाहेब थोरात यांचे नातू अभिषेक आनंद थोरात यांच्यात अटीतटीची लढत रंगली. या गटाचा निकाल थोरात घराण्यांपैकी कोणाचे वर्चस्व कायम राहणार, हे ठरवणारा ठरणार आहे. एकूणच, दौंड तालुक्यातील निकालाकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.