

खडकवासला : पानशेत, वरसगाव धरण खोऱ्यातील घाटमाथ्यावरील होत असलेल्या रिमझिम पावसामुळे खडकवासला धरण साखळी शंभर टक्के भरून वाहू लागली आहे. त्यामुळे चारही धरणांतून विसर्ग सुरू केला आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात 2 हजार 568 क्युसेकपर्यंत वाढ केली.(Latest Pune News)
बुधवारी (दि. 1) सायंकाळी पाच वाजता खडकवासला धरण साखळीत 29.15 टीएमसी म्हणजे शंभर टक्के पाणीसाठा झाला. मंगळवारी (दि. 30) सकाळी सहा ते बुधवारी सकाळी सहा वाजेपर्यंत अनुक्रमे वरसगाव धरण परिसरात 17, पानशेत परिसरात 18, टेमघर परिसरात 12 व खडकवासला धरण परिसरात 4 मिलिमीटर पाऊस पडला. धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडल्याने धरण साठ्यात पाण्याची आवक वाढली. त्यामुळे पानशेतमधून 600, वरसगावमधून 600 तर टेमघरमधून 300 क्युसेकने पाणी सोडले जात आहे.
नदी काठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जादा पाणी सोडूनही खडकवासला धरणाची पातळी 95 टक्क्यावर स्थिर आहे.
धरण माथ्यावर उघडीप असली तरी घाटमाथ्यावरील रिमझिमीने पाण्याची आवक कमी-जास्त होत आहे. धरणांतून जादा पाणी सोडण्यासाठी 24 तास यंत्रणा सज्ज केली आहे. पावसाचा जोर कमी असल्याने मुठा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात नाही, असे असले तरी मुठा नदी वेगाने वाहत आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
मोहन भदाणे, उपविभागीय अभियंता, जलसंपदा विभाग, खडकवासला