.jpg?rect=0%2C3%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?rect=0%2C3%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुणे: हिंजवडी भागात गेल्या शनिवारी पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचून वाहतूक कोंडी झाली. याचे मुख्य कारण म्हणजे हिंजवडी येथील टाटा मेट्रोच्या कामामुळे निर्माण झालेले अडथळे. हे अडथळे येत्या सोमवारपर्यंत (दि. 16) दूर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जर काम वेळेत पूर्ण झाले नाही, तर पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) दहा कोटी रुपये दंडाची नोटीस टाटा कंपनीला देण्याची सूचना केली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. विधानभवन येथे आयोजित आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या आढावा बैठकीनंतर पवार माध्यमांशी बोलत होते. (Latest Pune News)
ते म्हणाले की, या बैठकीत जिल्ह्यात झालेल्या पावसाबाबत माहिती घेण्यात आली. पुढच्या आठवड्यात पालखी पुण्यात दाखल होणार आहे. त्यामुळे पावसामुळे पाणी साचणार्या ठिकाणांची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले आहेत. हिंजवडी मेट्रो प्रकल्पाची जबाबदारी टाटा कंपनीवर आहे.
या बैठकीला टाटा कंपनीच्या अधिकार्यांना बोलाविण्यात आले होते. त्या वेळी हिंजवडी येथे अडथळे निर्माण करणारी कामे सोमवारपर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्टपणे सांगण्यात आले. कामे वेळेत पूर्ण न झाल्यास पीएमआरडीएमार्फत 10 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल. आर्थिक फटका बसणार म्हटल्यावर माणूस हलतो, असे पवार यांनी म्हटले आहे.
गटारांची रुंदी व खोली वाढविण्याच्या सूचना
दिवे घाटात पाणी व चिखल मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येत असल्याचे काही व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. मात्र, त्या ठिकाणी सध्या काम सुरू आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या पावसाळी गटारांमुळे आणि जोरदार पावसामुळे पाणी रस्त्यावर आले आहे. आज त्या गटारांची रुंदी व खोली वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पालखी घाटातून जात असताना अनेक भाविक डोंगरावर बसतात. पण, डोंगरावरील काही खडक ठिसूळ असल्याने त्या ठिकाणी बॅरिकेड लावण्याचे आदेश दिले आहेत. दिवे घाट चढताना वारकर्यांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी घाटातील अनधिकृत फ्लेक्स व जाहिरात फलक हटविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अधिकृत फलकांसाठी स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
वारकरी वेगवेगळ्या मार्गांनी पुण्याबाहेर पडतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. पिंपरी-चिंचवडची हद्द संपली की पुणे शहराची हद्द सुरू होते. त्या टप्प्यावर एकाच वेळी दोन्ही हद्दीतील पोलिसांनी काही अंतर सोबत राहणे आवश्यक आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडचे पोलिस पुणे हद्दीत एक-दोन किलोमीटरपर्यंत यावेत, तसेच पुणे शहराचे पोलिस ग्रामीण भागात काही अंतरापर्यंत जावेत, अशा सूचना पोलिस विभागाला उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या आहेत.