

अविनाश दुधवडे
चाकण: वाहन उद्योगाची पंढरी म्हणून लौकिक असलेल्या चाकण औद्योगिक वसाहतीतील तब्बल २० लघुउद्योगांनी वाहतूक कोंडी, प्रदूषण, पाणी, वीज आणि रस्त्यांच्या समस्यांमुळे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सततची कोंडी आणि अपुऱ्या पायाभूत सुविधा हे मुद्दे पुन्हा चर्चेत आले आहेत. मात्र, आधीची उदाहरणे पाहता सरकारी आश्वासनापलिकडे चाकणमधील उद्योगांच्या हाती काय लागेल? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पुणे-नाशिक महामार्गावरील रस्ते तेवढेच राहिले आणि वाहने कित्येक पटीत वाढली आहेत. सन २००४ मध्ये वाहनसंख्या दर प्रतिदिवस २५ हजार कार युनिट एवढा होता. दुचाकी-अर्धा युनिट, तीनचाकी व लहान कार-एक युनिट, ट्रक, बस व कंटेनर प्रत्येकी-साडेतीन युनिट अशाप्रमाणे गाड्यांचे युनिट मोजले जातात. हाच वाहनदर सन २०१४ मध्ये ५० हजार होता. तर, सन २०१८ मध्ये दररोज जवळपास ७०-७५ हजार लहान-मोठी वाहने या मार्गावरून धावत असल्याची आकडेवारी समोर आली होती. २०२६ मध्ये यात प्रचंड वाढ झाली असून, सद्य:स्थितीत वाढलेली वाहनसंख्या, रस्त्यावरील अतिक्रमणे तसेच बेकायदा प्रवासी वाहने, यांचा विचार केला तर रस्त्यांवरील प्रचंड वाहतूक कशी नियंत्रित होणार? असा यक्ष प्रश्न खुद्द प्रशासनासमोर उभा आहे.
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील नाशिक फाट्यापासून उत्तर पुणे जिल्ह्यातील अंतरापेक्षा प्रवासाला अधिक वेळ लागत असल्याची हतबलता गेल्या काही दिवसांपासून महामार्गावरील प्रवासी अनुभवत आहेत. चाकण येथील तळेगाव चौक, आंबेठाण चौक, आळंदी फाटा, चिंबळी फाटा, मोशी, खेड तालुक्यातील राजगुरुनगर ते पुण्यापर्यंतचा बहुतांश भाग ही वाहतूक कोंडीची जणू केंद्रेच झाली आहेत. या मार्गाला ठिकठिकाणी गावात जोडणारे अनेक रस्ते आहेत. अचानक महामार्गावर येणारी ही वाहनेसुद्धा अपघात आणि वाहतूक कोंडीला निमंत्रण देत आहेत.
चाकणला वाहतूक नियोजनाची कोंडी
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मागील काही वर्षांत दिवसभर लांबच लांब वाहनांच्या रांगा पहावयास मिळत आहेत. चाकण तळेगाव महामार्गावरही दिवसभर खराबवाडी, महाळुंगे, खालुंब्रे भागात चाकण मधील माणिक चौक भागात वाहतूक कोंडी होत आहे. चाकण एमआयडीसी मधील मधील सर्व रस्ते कंपन्या भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी ओव्हरफ्लो होत आहेत. प्रवाशी वाहतुकीची खाजगी वाहने भर रस्त्यात उभी असतात. चाकण वाहतूक शाखेने पोलिसांच्या बरोबर, ट्राफिक वार्डन आणि होमगार्ड यांच्या नेमणुका चौकाचौकात केल्या असल्या तरी वाहतूक कोंडी मात्र काही केल्या सुटत नसल्याचे विपर्यस्त चित्र पहावयास मिळत आहे. चाकणची वाहतूक शाखा बदलांचे प्रयोग करून वाहतूक कोंडी सोडविण्यात अपयशी ठरली आहे. या भागात येणारे अधिकारी केवळ आपले हात ओले करण्याच्या मागे धावताना कोंडी सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यात अपयशी ठरत आहेत.
रस्ते अपघातांमध्ये भरधाव मोटारी आणि अवजड मालवाहू वाहने दुचाकी चालकांसाठी यमदूत ठरत आहेत. चाकणमध्ये दररोज हजारो नागरिक, कर्मचारी प्रवास करतात. मात्र, येथील अपघातांची आकडेवारी मागील काही काळात प्रचंड वाढली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीत औद्योगिक भागात २०२५ आणि जून २०२६ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांपैकी दुचाकीस्वारांचे प्रमाण सुमरे ६० टक्के इतके आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय पोलिसांकडे असलेल्या नोंदीनुसार सन २०२५ मध्ये एकूण ३९९ जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. त्यापैकी २२६ दुचाकीस्वार होते, मागील २ वर्षांच्या एकत्रित आकडेवारीनुसार ५८० मृत्यूंपैकी ३३५ जण दुचाकीस्वार, तर २१ जण कारमधील प्रवासी किंवा चालक असल्याची बाब समोर आली आहे.
चाकण औद्योगिक परिसर अपघाताचा 'हॉटस्पॉट'
चाकण, महाळुंगे परिसरात रस्ते अपघातांचे प्रमाण शहरातील इतर भागांच्या तुलनेत अधिक असल्याचे पोलिसांच्या निरीक्षणातून समोर आले आहे. या परिसरात मोठ्या उद्योग कंपन्या, एमआयडीसी आणि लॉजिस्टिक हब असल्याने दिवसभर अवजड वाहनांची वर्दळ असते. त्याचवेळी हजारो कर्मचारी दुचाकींवरून कामासाठी ये-जा करतात. त्यातून अपघातांच्या अनेक घटना घडत आहेत. रस्ते अपघातांमध्ये भरधाव मोटारी आणि अवजड मालवाहू वाहने दुचाकी चालकांसाठी यमदूत ठरत आहेत. चाकणमध्ये दररोज हजारो नागरिक, कर्मचारी प्रवास करतात. मात्र, येथील अपघातांची आकडेवारी मागील काही काळात प्रचंड वाढली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीत औद्योगिक भागात २०२५ आणि जून २०२६ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांपैकी दुचाकीस्वारांचे प्रमाण सुमरे ६० टक्के इतके आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय पोलिसांकडे असलेल्या नोंदीनुसार सन २०२५ मध्ये एकूण ३९९ जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. त्यापैकी २२६ दुचाकीस्वार होते, मागील २ वर्षांच्या एकत्रित आकडेवारीनुसार ५८० मृत्यूंपैकी ३३५ जण दुचाकीस्वार, तर २१ जण कारमधील प्रवासी किंवा चालक असल्याची बाब समोर आली आहे.