

वेल्हे: तोरणा तसेच राजगड खोऱ्यात रिमझिम पाऊस सुरू आहे. धानेप (ता. राजगड) येथील गुंजवणी धरणात गुरुवारी (दि. १३) दुपारी ४ वाजता ३.३५ टीएमसी म्हणजे ९०.५९ टक्के साठा झाला होता.
धरणातून वीजनिर्मिती प्रकल्पाच्या सांडव्यातून २५० क्युसेक विसर्ग सुरू आहे. गुरुवारी दिवसभरात गुंजवणी धरण माथ्यावर ५ मिलिमीटर पाऊस पडला.
दि. १ जूनपासून १३ ऑगस्टपर्यंत धरण माथ्यावर १ हजार ७८८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गुंजवणी धरणाचे उप अभियंता नयन गिरमे म्हणाले, की धरण भरण्याच्या मार्गावर आहे. धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला आहे.
रिमझिम पावसामुळे पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे नियोजनानुसार धरणात १०० टक्के साठा होईल. दरम्यान, पावसाचा जोर ओसरल्याने राजगड-तोरणा खोऱ्यातील नद्यांसह ओढे-नाल्यांचे प्रवाह मंदावले आहेत. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे ओढे-नाले नद्यांना पूर आले आले होते. असे असले तरी रिमझिम पावसामुळे धरणात पाण्याची आवक मंदगतीने सुरू आहे.