

चाकण: चाकण औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांच्या समस्येमुळे काही कंपन्या महाराष्ट्राबाहेर किंवा राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये स्थलांतरित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, त्यातून रोजगारावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चाकणमधील औद्योगिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. उद्योजकांच्या समस्या केवळ चर्चेपुरत्या न ठेवता त्या प्रत्यक्ष समजून घेऊन त्यावर मार्ग काढण्याच्या दृष्टीने रविवारी (दि. १६) सायंकाळी ४ वाजता चाकण येथे उद्योजक आणि औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष बैठक घेण्यात येणार आहे.
चाकण हे महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासातील महत्त्वाचे केंद्र असून, येथील उद्योगांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि उद्योजकांना येणाऱ्या अडचणी दूर करणे याला शासनाचे प्राधान्य आहे. रस्ते, वाहतूक तसेच इतर पायाभूत सुविधांबाबत उद्योजकांच्या असलेल्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घेऊन संबंधित विभागांच्या समन्वयातून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.
आमदार रोहित पवार उद्योगांशी साधणार संवाद
चाकण औद्योगिक वसाहत सोडून न जाता सरकारवर दबाव आणून आपल्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी आणि त्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी शुक्रवारी (दि. १४) सकाळी १० वाजता चाकण एमआयडीसी इथे आमदार रोहित पवार उद्योजकांची भेट घेऊन संवाद साधणार आहेत.
जिल्हाधिकारी यांच्याकडून पाहणी
चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा असे निर्देश पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह यांनी दिले आहेत.
त्यानंतर गुरुवारी (दि. १३) जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी चाकणमध्ये येऊन रस्त्यांची स्थिती व उपाययोजना यांची पाहणी केली. यावेळी विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी स्थानिकांशी संवाद साधला.