पुणे : पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या दहावी- बारावीची परीक्षा आज गुरुवार (दि.15) पासून सुरू होणार आहेत. भारताव्यतिरिक्त तब्बल 26 देशांमधील 39 लाखांवर विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. दिल्लीतील 877 परीक्षा केंद्रांवर 5 लाख 80 हजार 192 विद्यार्थी परीक्षा देणार असल्याचे सीबीएसईने स्पष्ट केले. सीबीएसईतर्फे घेण्यात येणारी दहावीची परीक्षा 15 फेब्रुवारी ते 13 मार्चदरम्यान, तर बारावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 2 एप्रिल या कालावधीत होणार आहेत. पेपर सकाळी 10.30 वाजता सुरू होईल. त्यासाठी परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांनी सकाळी 10 वाजता हजर राहावे.
दहा वाजल्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यास अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घरातून लवकर निघावे, तसेच मेट्रो सेवेचा वापर करण्याचे निर्देश दिले आहेत.
भारतातील अन्य राज्यांमधील विद्यार्थ्यांनीदेखील स्थानिक परिस्थिती, हवामान, परीक्षा केंद्रापासून घराचे अंतर या सर्वांचा विचार करून परीक्षा केंद्रांवर वेळेत पोहोचण्याच्या दृष्टीने प्रवासाचे योग्य नियोजन करावे. तसेच विद्यार्थ्यांनीदेखील संपूर्ण परीक्षेच्या काळात परीक्षा केंद्रांवर वेळेपूर्वी किंवा वेळेतच हजर राहावे, असे स्पष्ट निर्देश सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक डॉ. संयम भारद्वाज यांनी दिले आहेत.
हेही वाचा