पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : अंडाभुर्जी गाडीजवळ लघुशंका केली म्हणून टोळक्याने पाठलाग करून कोयत्याने वार करत दोघांवर जीवघेणा हल्ला केला. ही घटना शुक्रवारी (दि. 29) वाकड येथील भूमकर चौकात मध्यरात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
चेतन ऊर्फ श्रीपती भिवाजी कातपुरे (वय 22) आणि ऋतिक भिवाजी कातपुरे (20, दोघेही रा. थेरगाव) अशी अटक आरोपींची नावे आहेत. तसेच, त्यांच्या दोन साथीदारांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकऱणी निखिल देवदत्त सुर्यवंशी (29, रा.वाकड) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या हल्ल्यात विशाल अडसूळ व आकाश जाधव हे दोघे जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे मित्र आकाश, विशाल हे आरोपी यांच्या अंडाभुर्जीच्या गाडीवर भुर्जी खाण्यासाठी गेले. तेथे फिर्यादी व त्यांच्या मित्रांनी भुर्जीच्या गाडीजवळ लघुशंका केली. यावरून फिर्यादी व आरोपी यांच्यात भांडणे झाली. याचा राग मनात धरून आरोपी चेतन व ऋतिक यांनी त्यांच्या इतर दोन साथीदारांसह विशाल व आकाश यांचा पाठलाग केला. त्यांच्यावर लोखंडी कोयत्याने गळ्यावर, तोंडावर, पाटीवर वार केले. फौजदार सी. एम. बोरकर तपास करत आहेत.
हेही वाचा