पुणे
काळजी घ्या ! उष्माघाताचे वाढते प्रमाण चिंताजनक; 15 दिवसांत 13 रुग्ण
पुणे : पुढारी वृत्तसेवा : मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उष्णतेची लाट जाणवू लागली आहे. त्यामुळे उष्माघाताच्या त्रासाची शक्यताही वाढली आहे. गेल्या 15 दिवसांत राज्यात 13 रुग्णांना उष्माघाताचा त्रास झाला आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण बीड येथील आहेत. तेथील 4 रुग्णांना उष्माघाताचा त्रास झाला आहे. रायगडमध्ये 2, तर अहमदनगर, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, धुळे, सातारा येथे प्रत्येकी 1 रुग्णाची नोंद झाली आहे.
राज्यात 1 मार्च ते 31 जुलैदरम्यान उष्माघाताचे सर्वेक्षण केले जाते. यासंदर्भात जिल्हा नोडल अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी, जिल्हा साथरोग अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले. जिल्हा, महापालिका आणि नगरपालिकांमध्ये उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आले. जिल्हास्तरावर उष्माघातामुळे मृत्यू झाल्यास अन्वेषण करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
अतिजोखमीचे घटक
- 65 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वय असणा-या व्यक्ती
- 0 ते 5 वर्षे वयोगटातील मुले
- गर्भवती माता
- मधुमेह, हृदयविकाराचे रुग्ण
- अतिउष्ण वातावरणामध्ये काम करणा-या व्यक्ती
कारणे
- उन्हाळ्यामध्ये शेतावर अथवा इतर मजुरीची कामे फार वेळ करणे
- कारखान्यांच्या बॉयलर रुममध्ये काम करणे
- काच कारखान्यातील कामे
- घट्ट कपड्यांचा वापर
लक्षणे
- पुरळ/घामूळ
- उष्णतेने स्नायूमध्ये पेटके येणे
- पाय, घोटा आणि हातांना सूज
- थकवा येणे
- बेशुध्द होणे
प्रतिबंधात्मक उपाय
- वाढत्या तापमानात कष्टाची कामे करणे टाळावे.
- उष्णता शोषूण घेणारे कपडे घालावेत.
- भरपूर पाणी प्यावे.
- उन्हात जाताना डोके, कान, नाक, डोळे यांचे संरक्षण करावे.
हेही वाचा

