

शिवनगर: बारामती-फलटण राज्य महामार्ग क्रमांक 10 च्या भूसंपादन प्रक्रियेबाबत सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत डॉ. राजेंद्रकुमार नानासाहेब सस्ते यांच्या संघर्षाला यश मिळाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने याप्रकरणी डॉ. सस्ते यांच्या बाजूने निकाल देत, प्रशासनाने केलेल्या भूसंपादनाच्या प्रक्रियांवर ताशेरे ओढत निर्धारित कालावधीचे पालन न केल्यामुळे पूर्वीचा निवाडा रद्द करून नव्याने भूमी संपादन करावयाचे आदेश पारित केले, अनेक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी हा निकाल फायदेशीर ठरणार आहे.
राज्य महामार्ग क्रमांक 10च्या रुंदीकरणाच्या भूमी संपादनासाठी सन 2016 साली निवाडा घोषित करण्यात येऊन यामध्ये डॉ. राजेंद्र सस्ते यांची जमीन संपादित करण्यात आली होती. याविरोधात डॉ. सस्ते यांनी यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करून ही प्रक्रिया राबवताना भूसंपादन कायद्याचे उल्लंघन झाल्याचा दावा केला होता.
जमिनीचा योग्य मोबदला न मिळणे आणि नोटीस बजावण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचे तसेच दिरंगाई झाल्याचे मुद्दे त्यांनी न्यायालयासमोर मांडले होते. न्यायमूर्ती मनीष पितळे व न्यायमूर्ती एस. वाय. शिरसाट यांच्या खंडपीठाने गंभीर दखल घेत पूर्वीचा केलेला भूसंपादनाचा निवाडा रद्द करून भूसंपादन कायदा 2013 अन्वये भूमी संपादन करण्याचे आदेश दिले. याचिकाकर्ते सस्ते यांच्या वतीने ॲड. सुशांत प्रभुणे यांनी युक्तिवाद केला.
राज्यातील बाधित शेतकऱ्यांना फायदेशीर निकाल!
सार्वजनिक हितासाठी जमीन संपादित करण्याचा अधिकार शासनाला असला तरी ही प्रक्रिया विहित कायदेशीर मार्गाने झाली पाहिजे, कोणत्याही नागरिकाला त्याच्या मालमत्तेपासून वंचित ठेवताना नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे. भविष्यातील भूसंपादन करताना सरकारी विभागाला अधिक सतर्क करावे लागणार आहे. राज्यातील बाधित शेतकऱ्यांना दिशादर्शक ठरेल, असा हा निकाल आहे.
प्रदीर्घ संघर्षानंतर बाधित शेतकऱ्यांची न्याय, सन्मान व प्रतिष्ठेची लढाई जिंकली ही भावना सर्वोच्च समाधान देणारी आहे. हा निकाल प्रशासनाला भूमी संपादन कायद्याच्या अधिन राहून बाधितांच्या हितकारक व न्यायप्रवीष्ट तरतुदींचे निर्धारित वेळेत पालन करणारी शिस्त निर्माण करणारा ठरेल.
डॉ. राजेंद्रकुमार नानासाहेब सस्ते, याचिकाकर्ते, खांडज (ता. बारामती)
हा निकाल एक ‘लँडमार्क जजमेंट’ असून, दिशादर्शक आहे. भूमी संपादन प्रक्रियेत प्रशासनाच्या कार्यपद्धतीमधील त्रुटी, अपारदर्शकता, वेळ काढूपणा, मनमानी व अन्यायपूर्ण भूमिका यांना पायबंद निर्माण करणारा ठरेल.
ॲड. मिथुन प्रकाश सस्ते, बारामती, पुणे