

बारामती: बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे खुर्द येथील निरा नदीचे पाणी कमालीचे प्रदूषित झाले आहे. त्यामुळे लाखो मासे मृत झाले आहेत. पात्रालगत या माशांचा अक्षरश: खच पडला, तर पात्रातही हजारो मासे तडफडताना दिसतात. मृत माशांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या पाण्यामुळे शेती नापीक होत आहे.
कोऱ्हाळे खुर्द येथे बंधाऱ्याच्या वरच्या बाजूस पाणी अतिशय अस्वच्छ बनले आहे. या पाण्याने शेती नापीक होत आहे. एकेकाळी पिण्यास योग्य असलेले निरेचे पाणी आता पूर्णतः खराब झाल्याची खंत ग््राामस्थ व्यक्त करीत आहेत. साखर कारखाना तसेच फलटण तालुक्यातील विविध कंपन्या, नाले, ओढे आणि औद्योगिक सांडपाण्यामुळे नदीचे प्रदूषण वाढत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.
कांबळेश्वर, सांगवी, शिरवली, खांडज, निरावागज या भागातील प्रदूषणाबाबत फलटण तालुक्यातील कत्तलखाने व दूध प्रक्रिया उद्योगांकडे बोट दाखविले जाते. मात्र, कोऱ्हाळे खुर्द व होळ परिसरातच ही स्थिती निर्माण झाल्याने साखर कारखाना व इतर उद्योगांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
अनेकांकडून पाहण्या; मात्र उपाययोजना शून्य
यापूर्वी केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद पटेल यांनी निरा नदीच्या प्रदूषणाची पाहणी केली होती तसेच खासदार शरद पवार यांनीही निरावागज परिसरात निरेच्या प्रदूषणाची पाहणी केली होती. परंतु, उपाययोजना मात्र होताना दिसत नाही.
प्रदूषण मंडळाचे दुर्लक्ष
नदीतील माशांचा जीव वाचविण्यासाठी तातडीने उपाययोजना होणे आवश्यक आहे. मात्र कोणत्याही शासकीय यंत्रणेने अद्याप ठोस पावले उचललेली नाहीत. प्रदूषण नियंत्रणासाठी स्थापन करण्यात आलेल्या कार्यालयाकडूनही अपेक्षित कार्यवाही होत नाही.