

बारामती: आखाती देशात युद्ध पेटल्याने चिंतातुर झालेल्या ग््रााहकांनी घरगुती गॅस सिलिंडरची नोंदणी वाढवली आहे. बारामतीत ही नोंदणी पाचपटीने वाढल्याने वितरणावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. गॅस सिलिंडर मिळण्यासाठी ग््रााहकांकडून रांगा लागल्याची स्थिती निर्माण झाली आहे. परंतु, परिस्थिती नियंत्रणात असून, टंचाईची स्थिती नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
एकट्या बारामती शहराचा विचार करता येथे भारत व हिंदुस्थान पेट्रोलियमचे मिळून चार वितरक आहेत. त्यांच्याकडून दरदिवशी अडीच हजार सिलिंडरचे वितरण केले जाते. आखाती देशात युद्ध स्थिती सध्या गंभीर वळणावर असल्याने सिलिंडरचा तुटवडा निर्माण होईल की काय, या भीतीने ग््रााहकांकडून मोठ्या प्रमाणात बुकिंग केले जात आहे. हे बुकिंग पाचपटीने वाढल्याचे वितरकांकडून सांगण्यात आले.
कंपनीकडून सिलिंडरची गाडी आल्यानंतर येथे टाक्या खाली करून त्या वितरित केल्या जातात. त्यानंतर रिकाम्या टाक्या वाहनात भरून परत पाठविल्या जातात. सध्यातरी कंपनीकडून वितरण सुरळीत असल्याची माहिती वितरकांनी दिली. परंतु, पॅनिक बुकिंग वाढल्याने थोडी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे, आता सिलिंडर वितरणावेळी ओटीपी बंधनकारक करण्यात आला आहे. अनेक कुटुंबांत घरातील पुरुषांचे मोबाईल त्यासाठी रजिस्टर्ड आहेत. ते घरी नसल्यास ओटीपी मिळाला नाही तर वितरणात अडथळे निर्माण होत आहेत. बुकिंग कालावधीत आता 25 दिवसांचे अंतर ठेवले गेले आहे. त्याचाही परिणाम जाणवतो आहे. त्यामुळे वितरकांनी सध्या हॉटेलला सिलिंडरपुरवठा पूर्णतः बंद केला आहे. हॉस्पिटल्स, कंपन्या यांना पुरविल्या जाणाऱ्या गॅसवरही मर्यादा आल्या आहेत.
दरम्यान, मंगळवारी (दि. 10) येथील भारत गॅस एजन्सीच्या कार्यालयाबाहेर सिलिंडर खरेदीसाठी रांगा लागल्याची स्थिती पाहायला मिळाली. घरगुती गॅसचा तुटवडा नसून ग््रााहकांनी केवायसी करून घ्यावी, असे आवाहन वितरकांनी केले आहे. केवायसी नसेल तर सिलिंडर मिळू शकत नाही, असेही सांगण्यात आले.
अशा स्थितीत शासनाकडून काही निर्बंध लादले गेले, तर आम्हाला तसे कळविले जाते. परंतु, अजूनतरी बारामतीत टंचाई नाही. व्यावसायिकांनी घरगुती सिलिंडरचा वापर करू नये; अन्यथा अत्यावश्यक सेवा अधिनियम कायद्यानुसार कारवाई होऊ शकते.
तितिक्षा बारापत्रे, पुरवठा निरीक्षक, बारामती
गॅस किंवा अन्य इंधनटंचाईची स्थिती सध्या बारामतीत नाही. शासनाकडून याबाबत अद्याप कोणतेही आदेश नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश आल्यानंतर त्याप्रमाणे कार्यवाही होईल. सध्या हॉटेल्स, ढाबे, खाद्यपदार्थांच्या हातगाड्या, चहाची दुकाने यांना पत्र देत घरगुती सिलिंडरचा वापर करू नये, असे कळविण्यात आले आहे. तरीही कोणी वापर करताना आढळले तर कारवाई केली जाईल.
स्वप्निल रावडे, तहसीलदार, बारामती