Baramati accident protest
बारामती: बारामतीत रविवारी (दि. 27) झालेल्या भीषण अपघातात दोन लहान मुलींसह पित्याला जीव गमवावा लागला. शहर व परिसरात सातत्याने होणार्या जीवघेण्या अपघातांमुळे जनभावना कमालीच्या तीव्र झाल्या आहेत. याबाबत मंगळवारी (दि. 29) नागरिकांनी प्रांत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
प्रांत कार्यालयासह पोलिस विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभाग, मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. संतप्त नागरिकांनी या वेळी प्रशासनाला धारेवर धरले. विकासाच्या नावाखाली बारामतीत रस्ते अरुंद होत असल्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले आहे. (Latest Pune News)
यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. शहरातील काही प्रमुख रस्त्यांवर आणि चौकांत सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. वाहनचालकांसह नागरिकांना याचा सामना करावा लागतो. यावर तत्काळ उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक असल्याचे नागरिकांनी सांगितले.
शहरातील मुख्य चौक आणि बाजारपेठेत सकाळी आणि संध्याकाळी वाहतुकीची मोठी कोंडी होते. यामुळे गोंधळ निर्माण होतो. शाळा सुटण्याच्या आणि भरण्याच्या वेळेस या परिसरात वाहनांची गर्दी वाढते. याचा विद्यार्थ्यांना आणि पालकांना त्रास होतो. अनेक ठिकाणी वाहनांचे अव्यवस्थित पार्किंग हे वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण बनले आहे.
भिगवण चौक ते पेन्सिल चौक यादरम्यान वाहतूक वाढली आहे आणि सुशोभीकरणामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. तसेच, रस्त्याच्या कामांनंतर बांधकाम साहित्य रस्त्यावरच सोडून दिले जाते. यामुळे रात्री अपघात घडतात.
सीसीटीव्ही कॅमेरे बसवा...
शहराच्या प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमे?े बसवावेत, अशी मागणी या वेळी करण्यात आली तसेच वाहतूक सुधारणेसाठी उपाययोजनाही सुचविण्यात आल्या. उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी नागरिकांचे म्हणणे जाणून घेतले. या वेळी मुख्याधिकारी पंकज भुसे, वाहतूक पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव आदी उपस्थित होते.
अवजड वाहनांची वाहतूक
वाढत्या वाहतुकीमुळे पादचार्यांसाठी रस्ते ओलांडणे कठीण झाले आहे. हायवा आणि इतर अवजड वाहने शाळा आणि गर्दीच्या परिसरातून भरधाव जातात. सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत अशा वाहनांना शहरात प्रवेशबंदी असावी. अनेक डंपरचालक दारू पिऊन किंवा मोबाईलवर बोलत गाडी चालवतात, ज्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. ओव्हरलोड वाहने भरधाव धावत आहेत. याशिवाय क्रेन, जेसीबी, पोकलेन यांच्या अतिवेगाचाही मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.