

मंचर: आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतातून होणाऱ्या बेबी कॉर्न निर्यातीवर निर्बंध आले असून, त्याचा फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे. परदेशी खरेदीदारांकडून मागणी कमी झाल्याने उत्पादित माल पाठविण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. परिणामी शेतकऱ्यांचे अर्थकारण संकटात सापडले आहे.
बेबी कॉर्न म्हणजे कोवळ्या अवस्थेत काढलेले मक्याचे लहान कणीस असून भाजी, सूप आणि सॅलडमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. दुबईसह परदेशी बाजारपेठांमध्ये याला चांगली मागणी असते. मात्र, सध्याच्या परिस्थितीत विमानसेवा कमी झाल्याने वाहतूक खर्च वाढला आहे. त्यामुळे निर्यात प्रक्रियेवर मर्यादा येत असून, उत्पादित मालापैकी केवळ निम्माच माल परदेशात पाठवता येत असल्याची माहिती मेंगडेवाडी येथील खरेदीदार योगेश मेंगडे यांनी दिली.
सध्या बेबी कॉर्नला शेतपातळीवर सुमारे 9 रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. करारशेती पद्धतीने काही व्यापारी हमीभाव देत असले तरी निर्यातीत अडथळे येत असल्याने व्यवहार मंदावले आहेत. परिस्थिती सुधारण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निरगुडसर येथील शेतकरी बाळासाहेब सावळेराम टाव्हरे तसेच व्यापाऱ्यांकडून होत आहे.
निर्यातीवरील मर्यादांमुळे फटका
आखाती युद्धामुळे बेबी कॉर्नची निर्यात मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे. विमानसेवा कमी झाल्याने वाहतूक खर्च वाढला आहे. त्यामुळे उत्पादित मालापैकी केवळ निम्माच माल निर्यात करता येत असून, शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे, असे कार्तिक ॲग््राो फूड्स, मेंगडेवाडीचे योगेश मेंगडे यांनी सांगितले.