

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांचे सहकार क्षेत्रासाठी अमूल्य योगदान राहिले असून, महाराष्ट्र घडविण्याचे काम त्यांनी सातत्याने केले. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत त्यांचा संचालक म्हणून प्रवेश झाला, त्या वेळी बँकेच्या ठेवी 300 कोटी रुपयांच्या आसपास होत्या. त्यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हा बँकेंच्या ठेवी 16 हजार कोटी रुपयांहून अधिक झाल्या असून, या प्रगतीचे सर्व श्रेय त्यांच्या नेतृत्वालाच जाते, अशी भावना जिल्हा बँकेचे संचालक सुरेश घुले यांनी व्यक्त केल्या.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बी. जे. रस्त्यावरील बँकेच्या मुख्यालयाच्या प्रांगणात स्व. अजितदादा पवार यांचा अस्थिकलश दर्शनासाठी मंगळवारी (दि. 3) सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत ठेवण्यात आला होता. या वेळात शेतकरी, नागरिक, शासकीय अधिकारी, बँकेचे संचालक मंडळ आणि अधिकारी-कर्मचारीवृंदाकडून अस्थिकलशाचे दर्शन घेण्यात आले. सकाळपासून लोकांची गर्दी दिसून आली. या वेळीही अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांना पुष्पांजली वाहताना अश्रू अनावर झाले.
राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे, साखर आयुक्त डॉ. संजय कोलते, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त अनिल कवडे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर वाघमारे, पुणे विभागीय सहनिबंधक योगिराज सुर्वे, जिल्हा उपनिबंधक संजय राऊत, मिलिंद सोबले, बाळासाहेब तावरे, मधुकांत गरड यांच्यासह अन्य शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही अस्थिकलशाचे दर्शन घेतले. या वेळी बँकेचे संचालक माऊली दाभाडे, प्रवीण शिंदे, विकास दांगट, भालचंद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, सरव्यवस्थापक संजय शितोळे व अन्य अधिकारीवर्ग, शासकीय अधिकारी-कर्मचारी दुपारी श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित होते.
तत्पूर्वी, घुले म्हणाले की, अजितदादा पवार यांच्या अस्थीचे दर्शन घेण्याची इच्छा सर्वदूर नागरिकांमध्ये होती. त्यादृष्टीने सुनील तटकरे यांच्याशी बोलून ही व्यवस्था जिल्हा बँकेत केली. पवार हे प्रथम छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक झाले. त्यानंतर ते जिल्हा बँकेवर संचालक म्हणून आले आणि त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवातच जिल्हा बँकेपासून सुरू झाली व ते बँकेचे अध्यक्ष झाले.
त्यानंतर राज्य सहकारी बँकेच्या अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. त्यानंतर त्यांनी राज्यमंत्री, कॅबिनेटमंत्री आणि सहावेळा राज्याचे उपमुख्यमंत्रिपदही भूषविले. खासदार म्हणूनही त्यांनी काम पाहिले. अनेक संस्थांवर ते कार्यरत राहिले. अजितदादांना विसरणे शक्यच नूसन ते आपल्यातून गेले, यावर अजूनही विश्वास बसत नसल्याचे ते म्हणाले. दरम्यान, पसायदान झाल्यानंतर अस्थिकलश हा तुळापूर येथील त्रिवेणी संगमावर नेण्यात आला आणि तिथे अस्थिविसर्जन करण्यात आल्याचे बँकेकडून सांगण्यात आले.