

काटेवाडी: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला सात दिवस उलटून गेले असले, तरी त्यांच्या जाण्याची वेदना अजूनही ताजी आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी व्यक्त केलेल्या भावना सध्या संपूर्ण महाराष्ट्राला भावुक करीत आहेत.
जय पवार यांनी आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर वडील अजित पवार यांच्यासोबतचे दोन फोटो शेअर करीत लिहिलेले शब्द हृदय पिळवटून टाकणारे आहेत. “तुमची खूप आठवण येतेय. डॅड काश, वेळ थांबली असती... मी तुम्हाला घट्ट मिठीत घेऊन आयुष्यभर तसाच राहिलो असतो. मसिंग यू अ लॉट डॅड!” या काही ओळींतून एका मुलाच्या मनातील न संपणारी वेदना, प्रेम आणि पोकळी प्रकर्षाने जाणवते.
जय पवार यांच्या या स्टेटसचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. राजकीय नेते, कार्यकर्ते तसेच सामान्य नागरिकांचे या पोस्टवर हळहळ व्यक्त करीत “डोळे पाणावले”, “हे शब्द काळजाला चटका लावणारे आहेत” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सात दिवसांपूर्वी झालेल्या त्या भीषण अपघातानंतर पवार कुटुंबीयांनी दु:ख बाजूला ठेवून सार्वजनिक जबाबदाऱ्या स्वीकारल्या. मात्र, या पोस्टमधून स्पष्ट होते की, त्या जबाबदाऱ्यांच्या आडही अजित पवार यांच्या जाण्याची वेदना
जय पवार यांच्या मनात खोलवर रुतलेली आहे.
जय पवार यांच्या या भावनिक शब्दांनी हेच दाखवून दिले आहे की, अजित पवार हे केवळ मोठे नेते नव्हते, तर आपल्या मुलासाठी ते प्रेमळ, आधार देणारे वडील होते. दादा गेले असले तरी त्यांच्या आठवणी आजही त्यांच्या मुलाच्या शब्दांतून जिवंत राहिल्या आहेत.