

सुवर्णा चव्हाण
पुणे: गेल्या काही वर्षांपासून पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या आयटी दिंडीबद्दल आपल्याला माहिती आहेच. यंदाही आयटी दिंडीचा प्रवास संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीत आळंदी ते पुणे असा असणार आहे. मागील वर्षापासून सुरू केलेल्या ऑल इन्क्लुसिव्ह दिंडी म्हणजेच एआय दिंडी (सर्वसमावेशक दिंडी) यंदाही आयोजित केली आहे.
पंढरपूरची वारी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने 'एआय दिंडी' (आयटी दिंडी संलग्न) यंदाही आळंदी ते पंढरपूर असा प्रवास पालखी सोहळ्यात करणार आहे. समाजातील प्रत्येकाला वारीचा अनुभव घेता यावा, या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाला यंदा देश-विदेशातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
यंदा आयटी दिंडी आणि एआय दिंडी मिळून पाच हजारांहून अधिक वारकरी सहभागी होणार आहेत. आयआयटीयन्सची दिंडी सुरू आहेच. पण, या दिंडीबरोबर एआय दिंडीही निघणार आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात आळंदी ते पंढरपूर या संपूर्ण मार्गावर 'एआय दिंडी' सहभागी होणार असून, दिंडी क्रमांक २५ म्हणून रथापुढे या दिंडीचा सहभाग असेल.
तसेच, जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात देहू ते आकुर्डी या टप्प्यातही एआय दिंडी सहभागी होणार आहे. यंदा आयटी दिंडी आणि एआय दिंडीत आयटीसह विविध क्षेत्रांतील व्यक्ती सहभागी होतील. या उपक्रमाचे नियोजन मागील तीन महिन्यांपासून सुरू असून, संपूर्ण वारीदरम्यान वारकऱ्यांना आवश्यक त्या प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे.
'त्या' वारकऱ्यांसाठीही विशेष व्यवस्था
आयटी आणि एआय दिंडीचे सचिन झापकर म्हणाले की, पूर्ण वारी पायी करण्याची इच्छा असलेल्या वारकऱ्यांसाठी एआय दिंडी हा एक सुव्यवस्थित पर्याय ठरत आहे. मात्र, नोकरीतील सुट्टीची अडचण किंवा वैद्यकीय कारणांमुळे संपूर्ण वारी चालणे शक्य नसलेल्या वारकऱ्यांसाठीही विशेष व्यवस्था केली आहे. अशा वारकऱ्यांना रोज पुण्यातून सकाळी बसने त्या दिवसाच्या वारीच्या प्रारंभस्थळी नेले जाईल आणि संबंधित टप्पा पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी पुन्हा पुण्यात परत आणण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक वारकरी दरवर्षी एक किंवा दोन टप्प्यांमध्ये सहभागी होत पंढरपूरपर्यंतचा वारीचा अनुभव घेणार आहेत.