पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) 'कॅप'च्या तीन फेर्या झाल्यानंतरच शैक्षणिक संस्थांनी व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश प्रक्रिया राबवावी. संस्थास्तरावर रिक्त राहणार्या जागांवर नियम डावलून प्रवेश करणार्या संस्थांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे. संस्थांवरील प्रवेश प्रक्रिया राबविताना नियमानुसार आणि गुणवत्तेनुसार प्रवेश होणे आवश्यक आहे, असे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.
संस्थास्तरावरील जागांच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भातच्या माहिती पुस्तिकेमध्ये सर्व नियम सूचित करण्यात आले आहेत. त्यानुसार तंतोतन पालन करून संस्थेने प्रवेश प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे. रिक्त जागा भरताना विद्यार्थ्यांनी केलेल्या अर्जाची यादी व त्यांची अंतिम गुणवत्ता यादी संस्थेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिध्द करण्यात यावी आणि सीईटी कक्षाच्या माहितीकरिता ही यादी ई-मेलद्वारे पाठवावी, असेही राज्य सीईटी सेलने सांगितले आहे.
राज्य सीईटी सेलच्या अंतर्गत असलेल्या तंत्रशिक्षण विभागातील विविध पदवी व पदव्युत्तर पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले जात आहेत. सध्या प्रवेशासाठी नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यात अर्जनिश्चिती आणि कागदपत्रांची पडताळणी होत आहे. ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर तीन नियमित प्रवेश फेर्या होतील. त्याचे वेळापत्रकही लवकरच प्रसिद्ध केले जाणार आहे.
प्रवेशाच्या सर्व फेर्या संपल्यानंतर काही जागा रिक्त राहतात. प्रवेशासाठीची रिक्त जागा संस्थांना त्यांच्या स्तरावर भरण्याची मुभा आहे. मात्र, संस्थास्तरावरील जागा भरताना नियम डावलून प्रवेश दिले जातात, अशी सर्वसामान्य पालकांची तक्रार असते. संस्थेने प्रवेशासाठी अर्ज मागविणे आणि गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे अपेक्षित आहे. त्यानुसार प्रवेशाची कार्यवाही करणे क्रमप्राप्त आहे. यामध्ये नियमांची पायमल्ली करणार्या संस्थांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा सीईटी सेलने दिला आहे.
हेही वाचा