पाण्याची बाटली 20 रुपयांना विकणे भोवले; वाचा काय आहे प्रकरण
पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे रेल्वे स्थानकावर 15 रुपयांची बाटली (रेल नीर) 20 रुपयांना प्रवाशांना विकणे एका विक्रेत्याला चांगलेच महाग पडले आहे. अशाप्रकारे प्रवाशांची फसवणूक करणे आणि प्रवाशांकडून अतिरिक्त पैसे उकळण्याच्या कारणावरून रेल्वे अधिकार्यांनी या ठेकेदाराला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. त्यासोबतच अशाप्रकारे फसवणूक केल्यास आणखी कडक कारवाई करण्याचा सक्त इशारा देखील दिला आहे. रेल्वे स्थानकावर 'रेल नीर'ची पाण्याची बाटली आणि एसटी स्थानकावर 'नाथ जल' ही पाण्याची बाटली प्रवाशांना 15 रुपयांना देणे बंधनकारक आहे. मात्र, विक्रेत्यांकडून या नियमाची सातत्याने ऐशीतैशी केली जात असल्याचे पाहायला मिळत आहे. याची तक्रार आल्यानंतर प्रशासन याची तपासणी करून कारवाई करते. मात्र, पुन्हा परिस्थिती 'जैसे थे'च असल्याचे दिसते. रेल्वे अधिकार्यांनी याबाबत कडक कारवाई करण्यासाठी पाऊल उचलत विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे प्रवाशांची लूट करणार्या विक्रेत्यांवर आता कडक कारवाई केली जाणार आहे.
इथे करा तक्रार
रेल्वे प्रशासनाला पाण्याच्या बाटली विक्रीमध्ये विक्रेत्यांकडून लूट होत असल्याच्या सातत्याने तक्रारी येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून याकरिता टोल क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. विक्रेत्यांनी प्रवाशांची लूट करण्याचा प्रयत्न केला, तर 9766353772 या क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन रेल्वे अधिकार्यांनी केले आहे.
प्रवाशांना पुरविल्या जाणार्या रेल नीर पाण्याच्या बाटल्यांच्या विक्रीतून लूट होत असल्याची तक्रार आम्हाला आली होती. त्याची प्रत्यक्ष पाहणी केल्यावर आम्ही संबंधित विक्रेत्याला पाच हजार रुपयांचा दंड केला आहे. तसेच, त्याला सक्त ताकीद दिली आहे. त्याचबरोबर प्रवाशांना अशा प्रकारच्या समस्या येत असतील, तर त्यांनी टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी.
– डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, रेल्वे, पुणे विभाग
हेही वाचा