

नारायणगाव: जुन्नर तालुक्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा सन 2025-26चा गळीत हंगाम संपला असून यंदाचा हंगाम 167 दिवस सुरू राहिला. या काळात कारखान्याने यंदाच्या वर्षी 9 लाख 3 हजार 711 मेट्रीक टन उसाचे गाळप केले. त्यापासून 9 लाख 91 हजार 101 साखर पोती उत्पादित झाल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी दिली.
शेरकर म्हणाले, यंदा विघ्नहर कारखाना तब्बल 167 दिवस चालला. शासनाच्या धोरणामुळे साखर कारखाने उशिरा सुरू झाले तसेच आपल्या कारखान्याचे विस्तारीकरण झाल्यामुळे 1 लाख 46 हजार मेट्रीक टन ऊस बाहेरच्या कारखान्याला देण्यात आला. कारखान्याच्या विस्तारीकरणामुळे यंदा ऊसतोडणी काही प्रमाणात उशिरा झाली. (Latest Pune News)
त्यामुळे ऊस उत्पादक सभासद व शेतकरी यांना मनस्ताप झाला. परंतु कारखान्यावर असलेले प्रेम व आमच्या नेतृत्वावर असलेला विश्वास यामुळे ऊस उत्पादक शेतकर्यांनी समजून घेत सहकार्य केले. पुढील वर्षी सर्व उसाचे गाळप वेळेवर होईल. कारखान्याकडे पुरेसा ऊस असला तरी गेटकेन ऊससुद्धा उपलब्ध केला जाईल.
कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार दिवंगत निवृत्तीशेठ शेरकर यांच्या मार्गदर्शक धोरणानुसार आम्ही संचालक मंडळ काम करीत असून कारखान्याचे सभासद व ऊस उत्पादक शेतकरी यांच्या हिताचा नेहमीच विचार केला जातो. खर्च वजा जाता उर्वरित रक्कम ऊस उत्पादक शेतकर्यांना देण्याचा नेहमीचाच प्रयत्न राहिलेला आहे.
कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्कर घुले, सचिव अरुण थोरवे, शेतकी अधिकारी सचिन पाटील, अभियंता बाळासाहेब शिंदे यांच्यासह चीफ केमिस्ट, सर्व कर्मचारी व ऊस तोडणी मजूर या सर्वांच्या सहकार्यामुळे गळीत हंगाम यशस्वीपणे पूर्ण करू शकलो. कारखान्याकडे नोंदलेल्या सर्व उसाची तोडणी देखील केली.
कारखान्याचे सभासद हे कारखान्याचे मालक असून आम्ही विश्वस्त मंडळी त्यांच्या विश्वासाला नेहमीच पात्र राहण्याचा प्रयत्न करीत असतो. यंदाच्या वर्षी विघ्नहर कारखान्याची निवडणूक पार पडली. सभासदांनी आमच्यावर विश्वास व्यक्त करून कारखान्याची सत्ता एकहाती आमच्या हाती दिली. सभासदांचा आमच्यावर असलेला विश्वास याचा मला नेहमीच अभिमान असल्याचेही अध्यक्ष शेरकर यांनी यावेळी नमूद केले.