पुणे : पुढारी वृत्तसेवा : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध आजार डोके वर काढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दूषित पाणी, दूषित अन्न यामुळे केवळ पावसाळ्यातच नव्हे, तर वर्षभर गॅस्ट्रो एन्टरायटिसचा त्रास होऊ शकतो. शहरात जानेवारी ते मे या कालावधीत 800 नागरिकांना गॅस्ट्रोचा संसर्ग झाल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.ओटीपोटात वेदना, उलट्या, सैल हालचाली, ताप, भूक न लागणे, सतत होणारी वांती, सुजलेले डोळे, सुस्तपणा, मलामध्ये रक्त आणि अगदी लघवीचे प्रमाण कमी होणे अशी लक्षणे आढळल्यास वैद्यकीय मदत घेण्याचा सल्ला वैद्यकतज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.
महिनानिहाय आकडेवारी
महिना : रुग्णसंख्या
जानेवारी : 99
फेब्रुवारी : 132
मार्च : 483
एप्रिल : 58
मे : 23
गॅस्ट्रोचा त्रास होत असल्यास पाणी पिणे सर्वात उत्तम मानले जाते. फळांचे रस, शहाळ्याचे पाणी वगैरे पिणेही हितकारक ठरते. या काळात सॉफ्ट ड्रिंक्स टाळावेत. अपचन, पोटदुखी, उलटी-जुलाब ही गॅस्ट्रोची प्रमुख लक्षणे आहेत. दूषित पाणी वा अस्वच्छ अन्न पोटात गेल्यानंतर पुढील 12 ते 72 तासांमध्येच हा त्रास सुरू होतो. अनेकदा ताप येणे, अंगदुखी अशी लक्षणेही दिसतात. अतिसार व उलटी होत असल्याने त्यांच्या शरीरातील पाणी कमी होते, अशक्तपणा वाढतो.
– डॉ. रोहित औटी, जनरल फिजिशियन
हे ही वाचा :