Raju Shetti: राज्यात दुष्काळ घोषित करुन पीक कर्ज वसुलीस स्थगिती दया : राजू शेट्टी | पुढारी

Raju Shetti: राज्यात दुष्काळ घोषित करुन पीक कर्ज वसुलीस स्थगिती दया : राजू शेट्टी

पुणे: पुढारी वृत्तसेवा: राज्यात त्वरित दुष्काळ जाहीर करून पीक कर्ज वसुलीस तातडीने स्थगिती दयावी. दुष्काळाची सर्वाधिक तीव्रता असलेल्या महसूल क्षेत्रात पीक कर्जमाफी घोषित करावी. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी. जनावरांसाठी विनाविलंब चारा छावण्या सुरु कराव्यात, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे आज (दि.२७) केली.

राजू  शेट्टी यांनी पुणे विभागीय आयुक्तांकडे कोणत्या मागण्या केल्या?

  • राज्यात त्वरित दुष्काळ जाहीर करा.
  • दुष्काळी महसूल क्षेत्रात पीक कर्जमाफी घोषित करावी
  • अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी.
  • जनावरांसाठी विनाविलंब चारा छावण्या सुरु कराव्यात.

शेट्टी यांनी आज दुपारी विभागीय आयुक्तांची भेट घेत मागण्यांचे निवेदन दिले आणि विस्तृत चर्चा केली. राज्य दुष्काळाने होरपळली जात असून पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी महिलांना वणवण फिरावे लागत असून जनावरे चार्‍यासाठी तडफडत आहेत. शासन व्यवस्था ठप्प असून प्रशासन हालचाल करत नसून आचारसंहितेचा बागलबुवा दाखवून निर्णय होत नाही. महावितरण कंपनी विजेचे कनेक्शन तोडत आहे. शासनाची जबाबदारी म्हणून दुष्काळासाठी त्यांनी तातडीने उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. अन्यथा जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शेट्टी यांनी दिला.

राज्यात मागणी येईल, त्या गावात विनाविलंब चारा छावण्या सुरु करण्यात याव्यात. पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर असून ज्या गावांत मागणी येईल, त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी टँकर त्वरित उपलब्ध करुन मिळावेत, अशाही मागण्या त्यांनी केल्या आहेत. एका बाजूला दुष्काळाने घेरले असताना काही भागात अवकाळीमुळे उरली सुरली हाताशी आलेली पिके, फळबागा उद्धवस्त झालेल्या असल्याने त्याचा प्रचंड मोठा आर्थिक फटका शेतकर्‍यांना बसला आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे विभागीय आयुक्तांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

Raju Shetti : शक्तीपीठ महामार्गाच्या जमिन अधिग्रहणास विरोध

शक्तीपीठ महामार्ग १२ जिल्ह्यातून जात आहे, त्यासाठी सक्तीचे जमीन अधिग्रहण केले जात आहे. हा शेतकर्‍यांवर वरंवटा फिरविण्याचा प्रकार आहे. शेतकर्‍यांचा प्रचंड विरोध असून आंदोलने होऊ लागल्याने त्याची दखल घ्यावी. आधीच सरकारने भूमि अधिग्रहण कायद्यात दुरुस्ती करुन शेतकर्‍यांचा विश्वासघात केलेला आहे. शेतकर्‍यांच्या जमिनी लुटण्याचे एक कायदेशीर कारस्थान केलेले आहे. अशा स्थितीत धार्मिक कारणे सांगून जर सरकार शेतकर्‍यांच्या जमिनी लुटू पाहत असेल, तर ते आम्ही कदापी होऊ देणार नाही, असाही इशाराही शेट्टी यांनी दिला आहे.

हेही वाचा 

Back to top button