धरण उशाला अन् कोरड घशाला! नांदेड गावातील नागरिक पाणीटंचाईमुळे त्रस्त | पुढारी

धरण उशाला अन् कोरड घशाला! नांदेड गावातील नागरिक पाणीटंचाईमुळे त्रस्त

दत्तात्रय नलावडे

खडकवासला : खडकवासला धरणाखालील सिंहगड रस्त्यावरील नांदेड येथे अपुर्‍या पाण्यामुळे पाणीटंचाईची समस्या गंभीर बनली आहे. लोकसंख्या वाढल्यामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणार्‍या बंद जलवाहिनीतून नांदेडला जादा पाणी देण्यास मंजुरी मिळाली आहे. मात्र, जलवाहिनीतून कनेक्शन घेण्यासाठी अद्यापही मुहूर्त मिळाला नाही. त्यामुळे ‘धरण उशाला अन् कोरड घशाला’ असे चित्र या गावात दिसून येत आहे.  ग्रामपंचायत काळात राबविण्यात आलेल्या योजनेतून सध्या नांदेड येथे पाणीपुरवठा सुरू आहे. गेल्या आठ दहा वर्षांत नांदेड परिसराची लोकसंख्या तीस हजारांहून अधिक झाली आहे.
पाणी मात्र दहा हजार लोकसंख्येसाठी मिळत आहे. ग्रामपंचायत काळात लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या पाण्याच्या टाकीत पाणी सोडले जात नाही. विहिरीतून थेट पाणीपुरवठा केला जात आहे.  महापालिकेत समावेश केलेल्या नांदेड गावात नेमका किती पाणीपुरवठा केला जात आहे, याचे मोजमाप करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने   मीटर बसविले आहेत. मात्र, अद्यापही नेमके मोजमाप झाले नाही. खडकवासला धरणातील पाण्याची पातळी खाली गेल्याने   बंद जलवाहिकेतून नांदेडला  पुरेसे पाणी मिळत नाही. त्याचा फटका  नागरिकांना बसत आहे. सिंहगड रोड, नांदेड फाटा, गोसावी वस्ती, जेपीनगर, गावठाण परिसरात   पाणीटंचाईची तीव्रता
वाढली आहे. ग्रामपंचायत काळात लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या पाण्याच्या टाकीत पाणी सोडले जात नाही. नांदेड गावाला सध्या या विहिरीतून थेट पाणीपुरवठा केला जात आहे.

बारा इंचाची जलवाहिनी बसविणार

पुण्याला पाणीपुरवठा करणार्‍या बंद जलवाहिकेतून नांदेडला  जादा पाणी देण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी  12 इंची जलवाहिनी बसविण्यात येणार आहे. मात्र, कनेक्शन जोडण्यासाठी मुख्य जलवाहिका बंद करावी लागणार आहे. मात्र, नवीन कनेक्शनची  जोडणी लवकरच करण्यात येईल. त्यानंतर या गावाला पुरेसे पाणी उपलब्ध होणार असल्याचे नांदेड पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता अक्षय गावित यांनी सांगितले.

टँकरमाफियांचा सुळसुळाट

शेजारील धायरी येथे महापालिका टँकरने पाणीपुरवठा करत आहेत. मात्र, नांदेड गावात महापालिकेने अद्याप टँकर सुरू केले नसल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. उन्हाच्या तीव्रतेबरोबर परिसरात टँकर माफियांचा सुळसुळाट सुरू आहे. नांदेड फाटा, गावठाण आदी ठिकाणी महिला व मुलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. खासगी टँकरची मागणी वाढली आहे. बंद जलवाहिकेतून नांदेडच्या पाणीपुरवठा करणार्‍या विहिरीत कमी पाणी येत आहे.  त्यामुळे दर दोन, तीन तासांनी पंप बंद करण्यात येत आहेत. परिणामी, पाणीपुरवठा कोलमडला आहे.
वारंवार विनंत्या करूनही पाणीपुरवठा विभागाने अद्यापही जादा पाणी दिले नाही. ग्रामपंचायत काळात मिळणारे पाणी वाढत्या लोकसंख्येला अपुरे पडत आहेत. सुधारित पाणीपुरवठा योजना अद्यापही कागदावरच आहे.
 – रूपेश घुले, माजी उपसरपंच, नांदेड
ग्रामपंचायत काळातील वितरण वाहिन्या अनेक ठिकाणी जीर्ण झाल्या आहेत. सोसायट्या, लोकवस्त्या वाढल्या आहेत. त्यामुळे पाण्याची मागणी वाढल्याने सध्याचा पाणीपुरवठा अपुरा पडत आहे. प्रशासनाने जादा क्षमतेची जलवाहिनी लवकरात लवकर टाकावी.
– उमेश कारले, रहिवासी

हेही वाचा

Back to top button