दुष्काळी झळा! धायरी परिसरात हंडाभर पाण्यासाठी वणवण | पुढारी

दुष्काळी झळा! धायरी परिसरात हंडाभर पाण्यासाठी वणवण

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : धायरी परिसरात वाढत्या उन्हाबरोबर पाणीटंचाई गंभीर बनली आहे. पाणीपुरवठा योजना कोलमडल्याने हजारो रहिवाशांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. पालिकेचे टँकर अपुरे पडत असल्याने विकतच्या खासगी टँकरवर तहान भागवण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे. दुप्पट पैसे देऊनही वेळेवर टँकर मिळत नसल्याने गंभीर चित्र धायरीतील अंबाईदरा, धनगरवस्ती, रायकर मळा परिसरात आहे. खडकवासला धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्याने धायरीला पुरेसे पाणी मिळत नाही असे पाणीपुरवठा विभागाचे म्हणणे आहे.

पालिकेच्या वतीने आठ टँकरच्या दररोज जवळपास शंभर खेपा टाकल्या जात आहे. मात्र, टंचाईग्रस्त भागात टँकरची मागणी दुप्पटीने वाढली आहे. भाजपचे संघटक संदीप पोकळे म्हणाले, महापालिकेच्या टँकरला पाणी मिळत नाही, तर खासगी टँकरचा सुळसुळाट झाला आहे. पालिकेत समाविष्ट होऊन 7 वर्षे होऊनही धायरीकरांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. रायकर मळा, जाधवनगर, धारेश्वर मंदिर परिसर, बेनकर वस्ती, अंबाईदरा भागात पालिकेने जादा टँकर सुरू करावेत अन्यथा तीव्र जन आंदोलन सुरू केले जाणार आहे.

धायरी पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता अक्षय गावित म्हणाले, पाण्याची मागणी वाढल्याने नियोजन करून उपलब्ध पाण्याचे वितरण केले जात आहेत. टंचाईग्रस्त भागात पालिकेच्या टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मागणी वाढल्याने आता एक टँकरच्या सरासरी दहा खेपा टाकल्या जात आहेत.

टंचाईग्रस्त लोकवस्त्या, सोसायट्यांत वेळेवर टँकर येत नाही. पाणीही दोन-तीन दिवसांतून येते. अनेक भागांत पाण्याअभावी नळ कोरडेच आहेत. पुणे मनपाचे पाणी उपलब्ध होत नाही. पाणीपुरवठा विभागाला विनंती करूनही टँकर मिळत नाही. दोन-तीन सोसायट्यांत मिळून टँकरची एकच खेप टाकली जात आहे. त्यामुळे खासगी टँकर घ्यावे लागत आहेत, अशी तक्रार नागरिकांनी केली. रायकरमळा,अंबाईदरा आदी ठिकाणी दिवसाआड, अर्धा ते पाऊण तास कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. रणरणत्या उन्हात धायरीकरांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे.

हेही वाचा

Back to top button