पाण्याअभावी पिके जळू लागली; पोटचार्‍यांना पाणी सोडण्याची मागणी | पुढारी

पाण्याअभावी पिके जळू लागली; पोटचार्‍यांना पाणी सोडण्याची मागणी

रावणगाव : पुढारी वृत्तसेवा : दौंड तालुक्याच्या पूर्व भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. येथील बहुतांश शेती ही पोटचार्‍यांच्या आधारावर आहे. त्यामुळे खडकवासला धरण कालव्याचे उन्हाळी आवर्तन तातडीने सोडण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.
राजेगाव, मलठण, बोरीबेल, स्वामी चिंचोली, तवेगाव, गाडेवाडी, काळेवाडी, खडकी, रावणगाव, नंदादेवी या भागात असलेल्या पाणीटंचाईमुळे नागरिकांचे प्रचंड हाल सुरू आहेत. काही ठिकाणची हातातोंडाशी काढणीला आलेली पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. पिकांना आता पाण्याची गरज आहे. जर पिकांना वेळेत पाणी मिळाले नाही तर येथील शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

या भागातील चार्‍यांना खडकवासला धरण कालव्याच्या मुळा-मुठा कालव्यातून पाणीपुरवठा केला जातो. सध्या कांदा, ऊस, मका व काही फळबागादेखील या पोटचार्‍यांच्या पाण्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे या भागातील पोटचार्‍यांना लवकरात लवकर पाणी सोडावे, अशी येथील शेतकर्‍यांनी मागणी केली आहे. उन्हाळी आवर्तन वेळेत आले तर येथील पाण्याचा प्रश्न मिटेल. चारीला पाणी कधी येईल याचीच सर्व शेतकरी प्रतीक्षा करत आहेत. 10 ते 12 दिवसांत मुख्य चारी असलेल्या बीबीसी तसेच 32 आणि 35 फाट्याला पाणी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती खडकवासला जलसंपदा विभागाचे उपकार्यकारी अभियंता शंकर बनकर यांनी दिली. तर आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नामुळे उन्हाळी दोन आवर्तने सोडण्यात येणार असल्याचे स्वामी चिंचोलीचे माजी सरपंच अझहरुद्दीन शेख यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button